अक्षय म्हणतो, इट्स माय फॉल्ट!
गेल्या आठवड्यात अक्षयची आणखी एक फिल्म आली आणि फ्लॉप झाली. इम्रान हाश्मीबरोबरच्या या ॲक्शन-कॉमेडी फिल्मने चाहत्यांना फारसा आनंद झालेला दिसत नाही. बॉक्स ऑफिसवरील आकडे हेच दर्शवतात. मल्याळी ड्रायव्हिंग लायसन्स या चित्रपटावरून सेल्फी बनवला आहे. मै खिलाडी और तु अनाडी या गाण्याचा रीमेक आणि चित्रपटाच्या ट्रेलरला चांगला रिस्पॉन्स मिळाला होता. मात्र, चित्रपट चाहत्यांना फार आवडल्याचे दिसत नाही.
सेल्फीने फार काही कमाई केली नसल्याचा दोष प्रेक्षकांवर टाकण्याचा प्रयत्न करू नका असा सल्ला देत त्याचा दोष अक्षय स्वत:कडे घेताना दिसत आहे. एका मुलाखतीत अक्षयने गेल्या काही काळातील आपल्या चित्रपटांच्या कामगिरीबाबत विवेचन केले आहे. तो म्हणतो की, तुमचा एखादा किंवा काही चित्रपट चांगली कामगिरी करत नसेल तर ती तुमच्यासाठी धोक्याची घंटी आहे असे समजा. तुमचे काही चित्रपट सलग फ्लॉप होत असतील तर तुम्हाला बदलण्याची वेळ आली आहे असे समजा. आता मी त्यासाठी प्रयत्न करत आहे, बदलण्याचे प्रयत्न करणे एवढेच आपल्या हातात आहे. माझा चित्रपट चालत नसेल तर प्रेक्षकांना दोष देण्यात काही अर्थ नाही. शंभर टक्के, दोष माझा आहे. चित्रपट चालणे प्रेक्षकांच्यावर अवलंबून नाही. तुम्ही कोणता चित्रपट स्वीकारता आणि त्यात तुमचे योगदान काय हे नक्कीच महत्त्वाचे असते.
भूतकाळात आपण यापेक्षाही अधिक खराब स्थितीला सामोरे गेल्याचे सांगून तो म्हणतो की, त्या वेळी माझे सलग सोळा चित्रपट फ्लॉप गेले होते. त्यामुळे माझ्याबाबतीत हे प्रथम घडत आहे असे नाही. एक काळ असा होता की माझे सलग आठ चित्रपट प्रेक्षकांना आवडले नव्हते. सध्या माझ्या तीन-चार चित्रपटांना फारसे यश मिळालेले नाही. अर्थात केवळ आणि केवळ माझ्या चुकीमुळे हे चित्रपट पडले आहेत. प्रेक्षकांची अभिरुची, आवड जशी बदलते तसे तुम्ही बदलायला हवे. सेल्फी शिवाय अलीकडच्या काळात बच्चन पांडे, सम्राट पृथ्वीराज, रक्षा बंधन, राम सेतू हे अक्षयचे चित्रपट २०२२ मध्ये प्रदर्शित झाले होते. ओटीटीवरील कठपुतळीमध्येही त्याने पोलीस अधिकाऱ्याची भूमिका केली होती.