'अख्तर यांनी फेटाळले' कंगना रणौतचे आरोप
अभिनेता सुशांत सिंह राजपूतने २०२० मध्ये आत्महत्या केली होती. त्याच्या आत्महत्येचे प्रकरण खूप गाजले होते. याच दरम्यान बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौतच्या एका वक्तव्याने खळबळ उडाली होती. तिने जावेद अख्तर यांनी तिला आत्महत्येस प्रवृत्त करत असल्याचा आरोप केला होता. आता तीन वर्षांनी ३ मे रोजी या प्रकरणावर सुनावणी झाली, ज्यात कंगनाचे विधान अपमानास्पद होतं, असे जावेद अख्तर म्हणाले आहेत.
कंगना रणौतच्या आरोपांवर नुकतीच न्यायालयात सुनावणी झाली, त्या वेळी जावेद अख्तर यांनी न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर आपली बाजू मांडत हे आरोप खोटे असल्याचं म्हटलं आहे. ते म्हणाले, “मी लखनौचा आहे आणि तिथे प्रत्येकाला आदराने हाक मारली जाते. ती व्यक्ती माझ्यापेक्षा ३०-४० वर्षांनी लहान असला तरीही मी सगळ्यांना तुम्ही म्हणून संबोधतो. मी कधीच माझ्या वकिलाचा उल्लेखही एकेरी केला नाही. माझ्यावर लावण्यात आलेल्या आरोपांमुळे मला धक्का बसला आहे. ते सर्व आरोप खोटे आहेत.”
जावेद अख्तर यांनी त्यांचे वकील जय भारद्वाज यांच्या प्रश्नांचीही उत्तरे दिली. ते म्हणाले, “कंगना रणौतने फेब्रुवारी २०२२ मध्ये तिने माझ्यावर हे सर्व आरोप केले होते आणि काही महिन्यांनी सुशांतचे निधन झाले तेव्हा हा मुद्दा सर्वांच्या चर्चेचा विषय बनला होता. त्यावेळी मी यावर कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. त्यावरून बराच गदारोळ झाला आणि तिने मी आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याचाही आरोप केला. हे विधान माझ्यासाठी अपमानास्पद होते.”
जावेद यांच्या मते, सुशांतच्या मृत्यूनंतर ‘आत्महत्या’ हा शब्द खूप गाजला होता. कंगनाने बॉलिवूडमध्ये आत्महत्येस प्रवृत्त करणारा गट असल्याचे म्हटले होते. पण त्यात अजिबात तथ्य नाही, असेही ते म्हणाले. दरम्यान, या प्रकरणी १२ जून रोजी पुढील सुनावणी होईल. या दिवशी कंगनालाही न्यायालयात हजर राहावे लागणार आहे.