प्रेमविवाह केला, हौसेनं संसार थाटला मात्र लग्नाच्या सहाच महिन्यात तरुणीला टोकाचं पाऊल उचलावं लागलं
पुणे : पुणे जिल्ह्यातून हादरवणारी बातमी समोर आली आहे. एका नवविवाहीतेने गळफास घेत आत्महत्या (suicide) केली आहे. पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील मंचरमध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे. तरुणीने हौसेनं संसार थाटला मात्र लग्नाच्या सहाच महिन्यात तिला टोकाचं पाऊल उचलावं लागलं. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
साक्षी अक्षय गाडे (Sakshi Akshay Gade) ( वय 20) असे मृत विवाहितेचे नाव आहे. सदर घटना मंचर परिसरातील माळवाडी मधील संकल्प रेसिडेन्सी या ठिकाणी 20 नोव्हेंबर रोजी घडली होती. आत्महत्येस पतीच कारणीभूत असल्याचे सांगत मुलीची आई अरुणा संजय गांजाळे (रा. मंचर) यांनी मंचर पोलीस ठाण्यात (Manchar Police) फिर्याद दाखल केली आहे. त्यावरून पोलीसांनी पती अक्षय गाडे याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, साक्षी व अक्षय या दोघांनी प्रेमविवाहातून सहामहिन्यापुर्वीच कोर्टात लग्न केले होते. त्यानंतर फिर्यादी यांनी दोघांचेही 12 जून 2023 रोजी हिंदू रिती रिवाजाप्रमाणे गणराज मंगल कार्यालय मंचर येथे लग्न लावून दिले. दोघांनीही हौसेनं संसार थाटला मात्र लग्नाच्या सहाच महिन्यात तरुणीला टोकाचं पाऊल उचलावं लागलं.
लग्नाच्या काही दिवसांनंतर साक्षीचा सासरकडून छळ करण्यास सुरुवात केली. तसेच कर्ज झाले आहे असे सांगून दोन लाख रूपयांची मागणी अक्षयने केली. त्यास नकार दिल्यानंतर त्याने मी साक्षीला सांभाळणार नाही, तिला मारून टाकीन. मला कोणीही काही करू शकत नाही. मी यापूर्वी 50 हजार रुपये खर्च करून दुसऱ्या मुलीचा मॅटर सॉल्व्ह केला आहे. त्यामुळे हा मॅटर सुध्दा मी सॉल्व्ह करू शकतो.” अशी धमकी त्याने दिली. तसेच त्याचे दुसरीकडे अनैतीक संबंध होते. हे साक्षीच्या निदर्शनास आले. तेव्हा साक्षीने विरोध करायाला सुरुवात केली. अक्षय हा दारू पिऊन येऊन साक्षीला मारहाण करत होता. तसेच त्याने साक्षीला भररस्त्यावर देखील मारहान केली होती. हा सर्व प्रकार साक्षीने मला सांगितला होता, असे फिर्यादीत नमूद केले आहे. ‘माझ्या मुलीच्या मृत्यूस तिचा नवरा अक्षय हाच कारणीभूत असल्याचे’ फिर्यादीत म्हटले आहे. पुढील तपास मंचर पोलीस करत आहेत.