संग्रहित छायाचित्र
किरकोळ वादाचा वचपा काढण्यासाठी दोघांनी प्रौढाला दुचाकीवरून बसवून झुडपात नेत हातोड्याने मारहाण करून खून (Murder) केल्याची घटना उघडकीस आली आहे.
बेपत्ता असणाऱ्या या प्रौढाचा शोध घेत असताना हा प्रकार उघडकीस आला आहे. चऱ्होली येथील अरणेश्वर टेकडीच्या पायथ्याला ही घटना सोमवारी (दि. २) उघडकीस आली. गुरुवारपासून (२८ सप्टेंबर) ते बेपत्ता होते. सिराज अहमद अबुल हसन खान (वय ४०, रा. कुदळवाडी, चिखली) असे अपहरण आणि खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. या प्रकरणी चिखली पोलिसांनी (Chikhali Police) सफिउद्दीन मोहम्मद शरीफ खान (वय ४०, रा. कुदळवाडी) आणि त्याचा साथीदार अनिस (रा. मुंबई) याला अटक केली आहे.
सिराज यांचा भाऊ निजाम अहमद अब्दुल हसन खान (वय ४२, रा. कुर्ला वेस्ट, मुंबई) यांनी या प्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सिराज यांचे आरोपींसोबत मागील दीड महिन्यांपूर्वी भांडण झाले होते. त्या भांडणाच्या कारणावरून गुरुवारी आरोपींनी सिराज खान यांचे कुदळवाडीमधून अपहरण केले. त्यांना जबरदस्तीने दुचाकीवर बसवून नेण्यात आले होते.
काही अंतर मुख्य रस्त्याने गेल्यावर सिराज यांना चऱ्होली येथील अरणेश्वर टेकडीच्या पायथ्याला निर्जन स्थळी नेण्यात आले. तिथे सिराज यांच्या डोक्यात आणि तोंडावर हातोडीचे घाव घालून त्यांचा खून केला. दरम्यान, सिराज बेपत्ता झाल्याबाबत चिखली पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली होती. पोलीस सिराज यांचा शोध घेत होते. दुसरीकडे सोमवारी सकाळी कुजलेल्या अवस्थेतील एक मृतदेह झाडीत पडला असल्याची माहिती गुराख्याकडून पोलिसांना मिळाली. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केल्यावर तो मृतदेह बेपत्ता सिराज यांचा असल्याचे उघड झाले. सिराज यांचा भाऊ आणि चिखली पोलीस परिसरात चौकशी करीत असताना आरोपी आणि सिराज यांची भांडणे झाल्याचे उघड झाले. त्यानंतर पोलिसांनी आरोपींची धरपकड केली. चिखली पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करीत आहेत.