वाघाच्या हल्ल्यात एक गाय आणि दोन कुत्र्यांचा मृत्यू
पुणे जिल्ह्यातील वेल्हे तालुक्यातील पाबे गावात वाघाच्या हल्ल्यात एक गाय आणि दोन कुत्रे मृत्यूमुखी पडले आहेत. गावातील विठ्ठलवाडी परिसरात शनिवारी सायंकाळी सहा ते साडेसहा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. मात्र, वाघाला जेरबंद करण्यात अद्याप यश आलेले नाही.
पाबे ग्रामपंचायत सदस्य सुनील रेणसे-पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी सायंकाळी सहा ते साडेसहाच्या सुमारास एका वाघाने केलेल्या हल्ल्यात गाय आणि दोन कुत्र्यांचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच गावच्या सरपंच ज्योति रेणूसे, ग्रामपंचायत सदस्य सुनील रेणुसे पाटील यांच्यासह स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली.
घटनास्थळी शेतकऱ्याची एक गाय व दोन कुत्र्यांचा वाघाने फडशा पाडल्याचे निदर्शनास येताच याबाबत वनविभागाला माहिती देण्यात आली. मात्र अद्यापपर्यंत येथे वाघाला जेरबंद करण्यात वनविभागाला यश आलेले नाही. त्यामुळे गावातील गावकरी दहशतीच्या वातावरणात आहेत. घरातून बाहेर पडणे अवघड झाले आहे. दिवसाही भीती वाटत आहे. तातडीने या वाघाला जेरबंद करावे, अशी विनंती गावकरी करत आहेत.