रस्ता कोठून जाणार हे समजण्याासठी महापालिकेचा निर्णय, पर्यावरणवाद्यांचा मात्र विरोध
सीविक मिरर ब्यूरो
बालभारती ते पौड फाटा रस्त्याला नागरिक आणि पर्यावरणवाद्यांचा तीव्र विरोध असल्याने हा रस्ता वेताळ टेकडीच्या कोणत्या भागातून जाणार आहे हे कळावे यासाठी महापालिका तेथे २५० सिमेंटचे खांब मार्कर म्हणून उभारणार आहे.
वेताळ टेकडीवरील बालभारती ते पौड फाटा या नियोजित रस्त्याला नागरिक आणि पर्यावरणवाद्यांचा तीव्र विरोध असून त्याविरोधात नागरिकांनी चळवळ उभारली होती. हा विरोध अजून मावळलेला नाही. विरोधकांना हा रस्ता कोठून आणि कसा जाणार आहे हे लगेच समजावे यासाठी महापालिकेतर्फे टेकडीच्या उतारावर २५० सिमेंटचे खांब मार्कर म्हणून टाकणार आहेत. यामुळे नागरिक आणि पर्यावरणवाद्यांच्या मतानुसार पर्यावरणाचे किती नुकसान होणार आहे हे स्पष्ट होणार आहे.
प्रस्तावित रस्त्याच्या अंतिम संरेखनाबाबत (अलाइनमेंट) स्पष्टता असणे महत्त्वाचे असले, तरी टेकडीवर मार्कर म्हणून सिमेंटचे खांब वापरण्याऐवजी, महापालिकेने पर्यावरणपूरक साहित्य वापरावे, अशी मागणी वेताळ टेकडी बचाव कृती समितीने केली आहे. हा रस्ता ३० मीटर रुंदीचा आणि २.१ किलोमीटर लांबीचा आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूने प्रत्येक २० मीटर अंतरावर सिमेंटचे खांब रोवले जाणार आहेत.
याबाबत समितीच्या डॉ. सुमिता काळे म्हणाल्या, ‘‘बालभारती ते पौड फाटा वेताळ टेकडीच्या कोणत्या भागातून जाणार आहे, हे नागरिकांना कळावे यासाठी महापालिका सुमारे तीन फूट उंचीचे २५० सिमेंटचे खांब लावणार आहे. परंतु, महापालिकेच्या विकास आराखड्यात दर्शविलेल्या मंजूर रस्त्याचे संरेखन सतत बदलत असल्याने नेमका रस्ता कुठून जाणार याबाबत स्पष्टता नाही. त्यात महापालिकेने संकेतस्थळावर टाकलेल्या सविस्तर प्रकल्प अहवालात (डीपीआर) देखील दोन संरेखन दिसून येतात. माहिती अधिकाराच्या अंतर्गत यासंबंधीच्या अर्जाला देखील महापालिकेकडून प्रतिसाद मिळालेला नाही. लोकांनाही रस्ता नेमका कुठून आहे हे कळावे , पण त्यासाठी सिमेंट खांब वापरणे, खोदण्याचे काम करणे हे पर्यावरणाच्या अनुषंगाने योग्य नाही. त्यामुळे पर्यावरणपूरक गोष्टींचा वापर करणे जसे की रंगीत खडकांना नियमित अंतरावर लावणे हा पर्याय वापरावा. सहा वर्षांपूर्वीचेच एचसीएमटीआर सिमेंट खांब अजूनही टेकडीवर आहेत.’’ वेताळ टेकडी वाचवण्यासाठी गेल्या महिन्यात हजारो नागरिक रस्त्यावर आले होते. हा प्रकल्प विकास अराखड्यातून काढून टाकावा आणि शहरातील टेकड्या ‘विकासकाम व बांधकाम न केले जाणारे क्षेत्र’ म्हणून जतन कराव्यात, अशी समितीची मागणी आहे.
दरम्यान विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गो-हे यांनीही या प्रकल्पाला विरोध केला असून त्यासंदर्भात पुणे पालिकेचे आयुक्त विक्रम कुमार यांना पत्र लिहून यासंदर्भात निर्णय मागे घेण्याची सूचना केली आहे. गो-हे यांनी झाडे तोंडण्यासही विरोध केला आहे. सविस्तर सुनावणी होऊन निर्णय होत नाही तोपर्यंत कुठलीही कार्यवाही करू नये, तसेच या संदर्भातील अहवाल सादर करावा असा आदेशही त्यांनी आयुक्तांना दिला आहे.