संग्रहित छायाचित्र
मुंबई-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील पुण्यातील कात्रज बोगदा ते नवले पुल दरम्यान सातत्याने अपघात होत आहेत. या अपघातांना रोखण्यासाठी पुणे पोलीसांनी वेग मर्यादेवर निर्बंध आणण्याचे आदेश दिले आहेत. कात्रज बोगदा ते नवले पूल दरम्यान अवजड वाहनांसाठी ४० किमी प्रतितास वेगमर्यादा निश्चित करण्यात आली आहे. याबाबत पुणे वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त विजय कुमार मगर यांनी आदेश जारी केले आहेत.
महामार्गावर सातत्याने अपघात होते आहेत. त्यामुळे पुणे पोलीसांन देखील या संदर्भात तज्ञ, नागरिक आणि प्रवाशांच्या तक्रारी येत होत्या. अखेर यावर पोलीसांनी वेगमर्यादा कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. रस्ता सुरक्षेच्या दृष्टीने मुंबई-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील कात्रज बोगदा ते नवले पूल दरम्यानच्या नियोजित पट्ट्यात प्रवास करणाऱ्या सर्व अवजड वाहनांसाठी ४० किमी प्रतितास ही कमाल वेग मर्यादा निश्चित करण्यात आली आहे.
दरम्यान, गेल्या काही वर्षात या महामार्गावर मोठ्या प्रमाणात अपघातात लोकांचे बळी गेले आहेत. २०१४ ते एप्रिल २०२३ या कालावधीतील मागील नऊ वर्षांतील आकडेवारीनुसार एकूण ८४ प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. तर २३५ जण जखमी झाले आहेत. तसेच २१५ अपघात झाले असून य़ामध्ये वाहनांचे नुकसान झाल्याची १६५ प्रकरणांची नोदं झाली आहे. या पार्श्वभूमीवर अखेर पुणे पोलीसांनी सुरक्षिततेच्या दृष्टीने पाऊस उचलले आहे. प्रवाशांची गैरसोय होऊ नये, त्यांच्या जीवाला धोका पोहचू नये, या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आला आहे.