माउलींच्या पालखीचे पिंपरी-चिंचवडमध्ये स्वागत
ज्ञानोबा माउली तुकाराम... असा ओसंडून वाहणारा जनसमुदाय... टाळ, मृदंग आणि अभंगाच्या तालामध्ये दंग झालेले वारकरी... हरिनामाच्या जयघोषात पंढरपूरच्या दिशेने निघालेल्या संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज पालखीचे पिंपरी-चिंचवड शहरात स्वागत करण्यात आले. यावेळी आयुक्त शेखर सिंह यांनी दिंडीकरी व विणेकरी यांचा सन्मान करत स्वागत केले.
आषाढी वारी पालखी सोहळ्यानिमित्त आळंदीहून पंढरपूरच्या दिशेने निघालेल्या संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीचे दिघी येथील मॅगझिन चौकात आगमन झाले, यावेळी आयुक्त शेखर सिंह यांच्या हस्ते पालखीचे स्वागत करण्यात आले. तसेच संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी रथाचे आयुक्तांनी काही काळ सारथ्य केले. महापालिकेच्या वतीने मॅगझिन चौकात, दिघी येथे स्वागत कक्ष उभारण्यात आला होता. यावेळी अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, विजयकुमार खोराटे, उल्हास जगताप, सह-आयुक्त चंद्रकांत इंदलकर, शहर अभियंता मकरंद निकम, सह-शहर अभियंता ज्ञानदेव जुंधारे, उपायुक्त रविकिरण घोडके, राजेश आगळे आदी अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी मानाच्या दिंड्यांना कापडी पिशवी, देशी वृक्षांच्या बिया, तुळशीचे रोप, संपर्क माहिती पुस्तिका आणि प्रथमोपचार पेटी देऊन सन्मान करण्यात आला. मॅगझिन चौक येथे भाविकांनी तसेच नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. या वर्षीही उद्यान व वृक्षसंवर्धन विभागाच्या वतीने पालखी स्वागताच्या ठिकाणी आकर्षक अशी फुलांची सजावट करून विठ्ठल तसेच संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांचे फुलांचे छायाचित्र रेखाटण्यात आले होते. आषाढीवारी निमित्त वृक्षारोपण, हरितवारी असे विविध उपक्रमदेखील महापालिकेच्या वतीने राबवण्यात आले आहेत. स्वागताच्या ठिकाणी महापालिकेच्या जगद्गुरू संत तुकाराम महाराज संतपीठाच्या शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी अभंग गायनाचा कार्यक्रम सादर केला.