सलग दुसऱ्या दिवशी इंद्रायणी नदीत मृत मासे
पंकज खोले
देहू (Dehu) परिसराची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत असून मोठमोठे गृहप्रकल्पे उभे राहात आहेत. त्यामुळे इंद्रायणी (Indrayani) नदीपात्रात थेट सांडपाणी मिसळत आहे. परिणामी, त्याचा फटका जलचरांना बसला असून सलग दुसऱ्या दिवशी देहू पुलाखालील चोखोबा मंदिरापाशी शेकडो मृत मासे बाहेर काढले. या प्रकरणी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने अद्याप कोणतीही ठोस कारवाई केली नसल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.
या परिसरातील अर्धवट बांधकामांमुळे सोसायट्यांना पूर्णत्वाचा दाखला मिळाला नसल्याचे उघडकीस आले आहे. येथील गृहप्रकल्पांचे दूषित व मैलामिश्रित सांडपाणी ओढ्यामार्फत नदीपात्रात मिसळत आहे. अशाच पाहणीतून कापूर ओढा या ठिकाणी थेट नदीपात्रात सांडपाणी सोडल्याचे निदर्शनास आले आहे. त्याचप्रमाणे काही ठिकाणचे चेंबर फुटले आहेत. त्यातून हे सांडपाणी नदीच्या पाण्यात मिसळत आहे. परिणामी, इंद्रायणी नदीच्या प्रदूषणात भर पडत आहे. यापूर्वी जलपर्णीमुळे दुर्गंधी पसरत होती. आता त्याचा परिणाम नदीतील जलचरांवर होऊ लागला आहे.
दरम्यान, दोन दिवस उलटले तरी राज्यातील प्रदूषण रोखण्याची जबाबदारी असणाऱ्या महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचा एकही अधिकारी या ठिकाणी आला नाही. नमामी इंद्रायणीचे सोमनाथ मुसूडगे आणि स्थानिक ग्रामस्थांनी पाण्यात उतरून हे मृत मासे बाहेर काढले. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी येथे येऊन ग्रामस्थांशी चर्चा करून नेमक्या तक्रारी समजून घेणे आवश्यक होते. मात्र तसे न करता ते फक्त पाण्याचे नमुने घेऊन गेले आहेत. मात्र कारवाई होताना दिसून येत नाही.
वैकुंठगमन अमृत महोत्सव सोहळा दहा दिवसांवर येऊन ठेपला आहे. सोहळ्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून लाखो भाविक येतात. सोहळ्यापूर्वी इंद्रायणी नदीपात्रात मृत झालेल्या माशांची माहिती मिळताच पर्यावरणावर काम करणाऱ्या विविध सामाजिक संस्थांनी जिल्हाधिकारी व महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाशी संपर्क साधून कारवाईची मागणी केली आहे. याबाबत प्रदूषण मंडळाकडून कारवाईबाबत प्रक्रिया सुरू असल्याचे सांगण्यात आले
देहूतील तीन मोठे ओढे व नाल्यांचे दूषित पाणी इंद्रायणी नदीपात्रामध्ये मिसळत असून नदीपात्रालगत असणारे सांडपाणी वाहून नेणारे अनेक चेंबरही फुटल्यामुळे नदी दूषित होत असल्याच्या तक्रारी त्यांनी केल्या आहेत. त्यावरती कारवाई होणे अपेक्षित आहे.
प्रदूषण मंडळाचे दुर्लक्ष
इंद्रायणी, पवना या नद्यांमध्ये मोठ्या प्रमाणात प्रदूषण वाढले आहे. इंद्रायणीमधील मासे हजारोंच्या संख्येने मृत्यू पडल्याची घटना घडली. मात्र, याकडे प्रदूषण नियंत्रण मंडळ दुर्लक्ष करत असल्याचे दिसून येते. गेल्या महिन्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आळंदी ग्रामस्थांनी तक्रारी केल्या होत्या. मात्र, महिना उलटूनही यावर ठोस कारवाई झाली नाही. घटना घडल्यानंतर केवळ नमुने गोळा करण्याचे काम विभागाने केले आहे.
इंद्राणी नदीत थेट सांडपाणी मिसळत असलेल्या चेंबर दुरुस्तीचे काम चालू आहे. आज पुन्हा शेकडो मृत मासे पाण्याच्या बाहेर काढले. यावरती कारवाई होताना दिसत नाही
— सोमनाथ मुसूडगे, नमामी इंद्रायणी