संग्रहित छायाचित्र
विधानसभेची निवडणूक जवळ येवून ठेपली असून राजकीय घडामोडींना वेग आला आहे. सर्वत्र राजकीय पक्षांच्या सभा, मेळावे तसेच बैठक होताना दिसत आहेत. अहमदनगर जिल्ह्याचं राजकारणही पेटल्याचं दिसत आहे.
अशातच माजी खासदार सुजय विखे पाटील यांच्या एका विधानाची मोठ्या प्रमाणावर चर्चा होताना दिसत आहे. ते राहता येथील एका कार्यक्रमात बोलत होते. जाती-धर्माच्या नावावर द्वेष पसरवणाऱ्यांना सुजय विखे पाटील यांनी इशारा दिलाय. परंतु हा इशारा नेमका कुणाला दिला याबद्दलही अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत.
निवडणुकीत पराभव झाल्यानंतर लोक कित्येक महिने दिसत नाहीत. परंतु निवडणुकीत पराभव झाल्यानंतर मी दुसऱ्याच दिवशी ईदगाह मैदानावर दिसलो. दुःखातून बाहेर येण्याचा ज्याचा त्याचा मार्ग असतो. शिर्डी विधानसभा मतदारसंघात जर कोणी धर्म किंवा जातीच्या नावावर द्वेष पसरवत असेल तर गाठ माझ्याशी आहे अशा आशयाचं विधान सुजय विखे पाटील यांनी केलं.
तसंच इथं कोणीही असुरक्षित नसून कुणालाही संरक्षण देण्याची गरज नाही. हिंदू-मुस्लिमांना संरक्षणाची गरज नाही. आपण वर्षानुवर्षे एकमेकांसोबत राहिलो आहोत. मग आता संरक्षणाची गरज काय? मतदार संघात तुमच्या नेतृत्वाने अनेक कामे केली, पण कधी जात विचारली नाही. पण काहीजण जातीचा द्वेष पसरवण्याचे काम करत आहे. असा आरोप ही सुजय विखे पाटील यांनी यावेळी केला.