संग्रहित छायाचित्र
पुणे: भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे टोला लगावला. मागील काही कालावधीपासून उद्धव ठाकरे हे आपल्या भाषणात आगपाखड करताना दिसत आहेत असे ते पुण्यात माध्यमांशी बोलताना म्हणाले. 'विधानसभा निवडणुकीत भाजपची उरली सुरली गुर्मीही उतरवू. सगळं सहन करून मी उभा राहिलो आहे. यापुढे राजकारणात राजकारणात एकतर ते राहतील किंवा मी राहील', असं विधान उद्धव ठाकरे यांनी केलं होतं. त्यांच्या या टीकेला भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी उत्तर दिलं आहे.
चंद्रकांत पाटील म्हणाले, उद्धव ठाकरे अलीकडच्या काळात खूप त्रागा करताना दिसत आहेत. माणसाने तेच बोलावं पण नीट बोलावं. म्हणजे मग ऐकणाऱ्यालाही वाटतं की समोरचा लाख मोलाची गोष्ट बोलला आहे. उद्धव ठाकरे असं का बोलत आहेत याचं कारण त्यांचं त्यांनाच माहिती. परंतु त्यांच्या विधानांना केवळ भाजपामधूनच नव्हे तर सर्वसामान्यांमधूनही प्रतिक्रिया येणार. कारण देवेंद्र फडणवीस हे पाच वर्ष केवळ मुख्यमंत्री नव्हते. तर प्रत्येक प्रश्नाला उत्तर शोधणारे मुख्यमंत्री होते. देवेंद्र फडणवीस यांच्या बद्दल सर्वसामान्य माणसाच्या मनात प्रेम आहे.
चंद्रकांत पाटील पुढे म्हणाले, उद्धव ठाकरे आणि माझा गेली ४० वर्षांचा परिचय आहे. असाच त्रागा यापूर्वी ते कधी करत नव्हते. मात्र अलीकडच्या काळात ते प्रत्येक भाषणात आगपाखड करताना दिसतात. उद्धव ठाकरे सतत म्हणतात एकनाथ शिंदे यांनी दगा दिला. एकनाथ शिंदे यांनी दगा दिला की तुम्ही त्यांच्यावर अन्याय करत होता आणि म्हणून एकनाथ शिंदे यांनी वेगळी वाट शोधली, याची सर्वसामान्य लोकांना कल्पना आहे. तुम्ही शिंदे यांचा हिंदुत्व नावाचा आत्मा डावलत होता. पालघर मध्ये हिंदू साधूंवर झालेला हल्ला हा टर्निंग पॉईंट ठरला. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी निर्णय घेतला. त्यामुळे तुम्ही अन्याय केला की त्यांनी दगा दिला हे जग ठरवेल. पण तुम्ही किती वेळा तेच तेच बोलत राहणार आहात. बाकीचेही विकासाचे विषय आहे. उद्धव ठाकरे यांनी नवीन विकासाच्या योजनांबद्दल बोलावं. मित्र या नात्याने उद्धव ठाकरे यांच्याकडून अशा स्वरूपाची आगपाखड का चालली आहे असा प्रश्न मला पडतो, असं चंद्रकांत पाटील यावेळी म्हणाले .