File Photo
विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने होणाऱ्या जागा वाटपासंदर्भात महायुतीमध्ये ९० टक्के सहमती झालेली आहे. उर्वरीत जागांविषयी लवकरच तोडगा काढला जाईल, असा दावा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी शुक्रवारी (दि. १८) पुण्यात केला.
उमेदवार देताना तो कोणत्या समाजाचा आहे हे आम्ही पहात नाही. तर, त्याची क्षमता काय आहे? जनतेचे त्याच्याबाबत काय मत आहे? इच्छुकांचे काम किती आहे? त्यांचे कर्तुत्व काय आहे, यावर उमेदवारी ठरत असते. तसेच, इच्छुकांनी तिकीट मागणे यात गैर काही नाही. जर कोणी बंड केलेच तर त्यांची समजूत काढू. एखाद्याला समजावून सांगण्यात काहीही गैर नाही, अशी भूमिकादेखील बावनकुळे यांनी संभाव्य बंडखोरीच्या पार्श्वभूमीवर मांडली.
राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यास राज्याचा बट्याबोळ होईल. केंद्र व राज्य सरकारने जनतेच्या हिताची कामे केली आहेत. भाजपाचे नाराज पदाधिकारी राष्ट्रवादी कॉँग्रेस पार्टीचे अध्यक्ष अजित पवारांची भेट आहेत. त्यापार्श्वभूमीवर बोलताना अजित पवार महायुतीचा घटक आहेत. त्यामुळे त्यांची एखाद्याने भेट घेतली तर त्यामध्ये गैर काही नाही, असे बावनकुळे यांनी स्पष्ट केले.
संजय काकडेंच्या निर्णयाबाबत माहिती नाही, जानकर भावासारखे...
संजय काकडे यांनी काय निर्णय घेतला आहे याबाबत मला काहीही माहिती नाही. मात्र, महादेव जानकर आमच्या भावासारखे आहेत. ते महायुतीमध्ये परत येतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. शिवसेना (शिंदे गट) आणि भाजपामध्ये काही मतदारसंघांचा त्याग कोणी करावा, यावरून वातावरण तापले आहे. यासंदर्भात विचाले असता बावनकुळे म्हणाले, ‘‘जाणीवपूर्वक माझ्या वाक्याचा विपर्यास करण्यात आला. मी तसे बोललोच नाही. जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी एकनाथ शिंदे काम करत आहेत. भाजपा मोठा भाऊ असे मानूनच शिंदे आमच्यासोबत चांगलं काम करीत आहेत.’’
उद्धव ठाकरे मराठा आरक्षणाचे खरे मारेकरी : बावनकुळे
यावेळी बावनकुळे यांनी महाविकास आघाडीसह शिवसेनेचे (उबाठा) प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावरदेखील टीका केली. ते म्हणाले, ‘‘दसरा मेळाव्यातील उद्धव ठाकरे यांचे भाषण हास्यजत्रा होते. ‘शोले’मधील ‘जेलर’ची परिस्थिती होती तशी उद्धव ठाकरे यांची स्थिती होईल. ‘कोई लौटा दे मेरे बीते हुए दिन’ अशी त्यांची अवस्था झाली आहे. उद्धव ठाकरेंची काँग्रेसच्या दृष्टीने उपयुक्तता संपली आहे. त्यांना दिल्लीमध्ये कोणी भेटत नाही.
बाळासाहेब ठाकरे हयात असताना शरद पवार भाजप-शिवसेना युती तोडू शकले नव्हते. ते उद्धव ठाकरे यांनी आपल्या काळात त्यांनी करून दाखवलं. उद्धव ठाकरेंचा निवडणुकीत वापर करून घेतला जाईल. नंतर त्यांना मुख्यमंत्री केले जाणार नाही. शरद पवारांनी त्यांचा मोठा विनोद करून ठेवला आहे. जनतेला टोमणे नको आहेत.
उद्धव ठाकरे मराठा आरक्षणाचे खरे मारेकरी आहेत. मनोज जरांगे-पाटील त्यांच्यावर टीका करण्याऐवजी देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करीत आहेत. फडणवीस यांच्या सरकारने दिलेले आरक्षण ठाकरे टिकवू शकले नाहीत. लोकसभेच्या निवडणुकीत खोटं बोलून महाविकास आघाडीने मतं घेतली. आता जनता त्या भूलथापांना भुलणार नाही.’’