संग्रहित छायाचित्र
आमिर खानचा मुलगा जुनैद खान याने नुकतेच ‘महाराजा’ चित्रपटातून पदार्पण केले आहे. त्याने एका मुलाखतीत वडील आमिर खान आणि आई रीना दत्ता यांच्याबद्दल सांगितले. यावेळी आमिर आणि जुनैद या बापलेकातील बाॅंडिंगदेखील दिसून आली.
जुनैद म्हणाला, ‘‘आईने माझ्या संगोपनात महत्त्वाची भूमिका बजावली. कारण वडील चित्रपटांमध्ये जास्त व्यस्त असायचे. लहानपणी त्यांना फारसा वेळ देता आला नाही. मात्र, जेव्हाही मला त्यांच्या मदतीची गरज असायची तेव्हा फोन केल्यावर काही वेळातच ते माझ्यासमोर उपस्थित व्हायचे आणि मग पाहिजे तेवढा वेळ मला द्यायचे. आताही यात बदल झालेला नाही.’’
वडील आमिर आपल्या अपयशातून खूप काही शिकले आहेत. ते चित्रपटांशी संबंधित सर्वोत्तम सल्ला देण्यात तज्ञ आहेत. मला त्यांच्याकडून खूप काही शिकायला मिळते. अपयशाचा त्यांच्यावर परिणाम होतो पण त्यावर मात करण्यासाठी त्यांना वेळ लागतो आणि नंतर त्यांच्याकडून शिकून पुढे जातात, असेही जनैदने आवर्जून सांगितले.
आयुष्यावर आईचा खूप मोठा प्रभाव असल्याचे जुनैद सांगतो. ‘‘तिनेच मला वाढवले आहे. पप्पा खूप चांगले आहेत पण ते खूप व्यस्त असतात. त्यामुळे प्रत्येक आघाडीवर माझी काळजी कोणी घेतली असेल तर ती माझी आई आहे. मला काही त्रास झाला तर मी आई, बाबा किंवा इराला कॉल करू शकतो. पप्पा कितीही व्यस्त असले तरी मला त्यांची गरज भासली तर ते माझ्यापर्यंत पोहोचायला काही मिनिटेच घेतात आणि मग त्यांचा सगळा वेळ फक्त मला देतात. माझे कुटुंब खूप सपोर्टिव्ह आणि मोकळे आहे ज्यात आम्ही हवे तेव्हा मोकळेपणाने बोलू शकतो,’’ असे तो म्हणाला.
काही वर्षांपूर्वी एका मुलाखतीत आमिरने असेही म्हटले होते की, त्याला त्याच्या मुलांसोबत म्हणजेच जुनैद आणि आयरासोबत जास्त वेळ घालवता आला नाही याची खंत आहे. ‘‘मी वयाच्या १८व्या वर्षी काम करायला सुरुवात केली. तेव्हापासून मी माझे संपूर्ण आयुष्य कामासाठी समर्पित केले आहे. मी माझे काम ज्या प्रकारे हाताळतो तसे मी माझे नातेसंबंध हाताळले नाही. मुलं लहान असताना मी त्यांना जास्त वेळ दिला नाही,’’ असे सांगताना आमिरने आपल्या मनातील अपराधभाव बोलून दाखवला.
आमिरने दोनदा लग्न केले होते, पण या दोन्ही वेळा त्याने घटस्फोट घेतला. आमिरने पहिली पत्नी रीनाशी १९८६ मध्ये लग्न केले. पण हे नाते टिकले नाही. २००२ मध्ये दोघांचा घटस्फोट झाला. त्यानंतर २००५ मध्ये आमिरने किरण रावसोबत लग्न केले. १६ वर्षांच्या संसारानंतर २०२१ मध्ये ते अधिकृतपणे वेगळे झाले. आमिर आणि किरण यांना आझाद हा मुलगा आहे. आमिरला पहिल्या लग्नापासून आयरा आणि जुनैद ही दोन मुले आहेत.
दोन्ही लग्नांचा शेवट घटस्फोटाने झाला असता तरी आमिरचे दोन्ही पत्नींसोबत अजूनही मैत्रीपूर्ण संबंध आहेत. मुलगी आयराच्या लग्नात त्याची प्रचिती आली. नुकत्याच झालेल्या या विवाह सोहळ्यात आमिर उत्साहाने सहभागी झाला होता. रीना आणि किरण यांच्या सोबतीने त्याने या विवाहातील सर्व विधी आणि कर्तव्ये पार पाडली.