संग्रहित छायाचित्र
प्रवीण तरडे दिग्दर्शित 'धर्मवीर: मुक्काम पोस्ट ठाणे' हा चित्रपट २०२२ मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाचा पुढचा भाग 'धर्मवीर २' आता ९ ऑगस्टला प्रदर्शित होतो आहे. या चित्रपटाचा म्युझिक लाँच सोहळा पार पडला. यावेळी गायक सुरेश वाडकर यांनी आनंद दिघेंची आठवण सांगितली. मी आनंद दिघेंना पाहिले की भीती वाटायची, मात्र आतून ते प्रेमळ होते, असे सांगत एक किस्सा सांगितला आहे.
धर्मवीर २ या चित्रपटाचं म्युझिक लाँच सुप्रसिद्ध गायक सुरेश वाडकर यांच्या हस्ते ठाण्यातील गडकरी रंगायतन इथे मोठ्या दिमाखात पार पडले. यावेळी चित्रपटाचे निर्माते, दिग्दर्शक, कलाकार, म्युझिक टीम आणि इतर मान्यवर मंडळी आवर्जून उपस्थित होती. काही दिवसांपूर्वीच लाँच करण्यात आलेल्या चित्रपटाच्या टीझरला प्रेक्षकांकडून दमदार प्रतिसाद मिळाला आहे. ‘धर्मवीर: मुक्काम पोस्ट ठाणे’ या चित्रपटाची गाणी अल्पावधीतच प्रचंड गाजली होती. त्यामुळे आता ‘धर्मवीर २’ या चित्रपटातील गाणी पाहिल्यानंतर चित्रपटाचे कथानक, कलाकार याविषयी लोकांना खूप उत्सुकता आहे. ‘साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट’ अशा टॅगलाईनसह या सिनेमाचा टीझर आला आहे. सिनेमात काय काय असणार हे पाहणे महत्त्वाचे असणार आहे.
मी दिघेसाहेबांना जवळून भेटलो आहे. त्यांच्याकडे पाहिले की मला भीती वाटायची पण ते मनाने एकदम निर्मळ होते. धर्मवीर २ हा सिनेमा ९८ आठवडे चालावा अशा मी शुभेच्छा देतो. तसेच मला इथे बोलवल्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो, असे सुरेश वाडकर यांनी म्हटले आहे. गुरुपौर्णिमा आणि आषाढी एकादशीच्या निमित्ताने तब्बल ४५ बाल कलाकारांनी पहिल्यांदाच धर्मवीर चित्रपटातील “गुरुपौर्णिमा” हे गीत गाऊन उपस्थितांची मने जिंकली. स्वर्गीय आनंद दिघे यांनी राजकारण आणि समाजकारणाचा सुंदर मेळ घातला होता. त्यामुळेच ते खूप लोकप्रिय झाले होते. शालेय विद्यार्थ्यांसाठी सराव परीक्षा सुरू करण्याचा पहिला प्रयत्न दिघे साहेबांनीच सुरू केला होता.
त्यामुळे चित्रपटाच्या म्युझिक लाँच सोहळ्यात गुरुपौर्णिमा गाण्याच्या सादरीकरणासह “चला करू तयारी…” हे गाणे उपस्थितांना दाखवण्यात आले. त्याचप्रमाणे दहावीतील परीक्षेतील उत्तम गुण मिळालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचे 'आनंद माझा' पुरस्कार देऊन कौतुक करण्यात आले. ‘धर्मवीर २’ या चित्रपटात एकूण चार गाणी आहेत. गीतकार मंगेश कांगणे, स्नेहल तरडे, डॉक्टर प्रसाद बिवरे, विश्वजीत जोशी यांनी लिहिलेल्या गीतांना अविनाश – विश्वजीत आणि चिनार-महेश यांचे सुमधुर संगीत लाभले आहे. तर ही गाणी सुप्रसिद्ध गायक हरिहरन, जावेद अली, सुखविंदर सिंग, विशाल दादलानी, आदर्श शिंदे, मनीष राजगिरे, बेला शेंडे यांच्या आवाजात मराठी आणि हिंदी भाषेत स्वरबद्ध करण्यात आली आहेत.