जेष्ठ नागरिकाची आत्महत्या
नवी खडकी परिसरात २८ मे रोजी एका हळदी समारंभाच्या कार्यक्रमात साउंडचा आवाज जोरजोरात येत असल्याने एका ज्येष्ठ नागरिकाने हा आवाज कमी करण्याची विनंती केली होती. मात्र, एकदा विनंती करून देखील आवाज कमी न केल्याने पुन्हा एकदा ते विनंती करण्यासाठी गेले. यावेळी त्यांना मारहाण करण्यात आली. इतकेच नव्हे तर यांच्या कुटुंबातील एकाच्या डोक्यावर कोयत्याने वार देखील करण्यात आले होते. त्यामुळे, सर्वांसमोर झालेला अपमान व झालेली मारहाण सहन न झाल्यामुळे ७० वर्षीय ज्येष्ठ नागरिकाने नदीत उडी घेत आपले जीवन संपवले आहे.
ज्ञानेश्वर साळुंखे असे आत्महत्या केलेल्या ज्येष्ठ नागरिकाचे नाव आहे. याप्रकरणी येरवडा पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ज्ञानेश्वर यांचा मुलगा पांडुरंग ज्ञानेश्वर साळुंखे यांनी येरवडा पोलीस ठाण्यात या प्रकरणी फिर्याद दिली आहे. त्यानुसार पाच जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. चेतन बेले (वय २६), देवेश ऊर्फ नन्या पवार (वय १८), यश मोहिते (वय १९), शाहरुख खान (वय २६), जय तानाजी भडकुंभे (वय २२) अशी ताब्यात घेण्यात आलेल्यांची नावे आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्ञानेश्वर साळुंखे यांच्या घराजवळ हळदीचा कार्यक्रम सुरू असताना साउंडचा मोठा आवाज येत होता. या आवाजाचा त्रास होत असल्याने ज्ञानेश्वर यांनी त्या ठिकाणी जाऊन आवाज कमी करा असे सांगितले. यावेळी त्यांना अपमानित करून हाकलून देण्यात आले होते. मात्र ज्ञानेश्वर हे पुन्हा एकदा त्या ठिकाणी आवाज कमी करा, असे सांगायला गेले होते.
त्यावेळी यांना व त्यांच्या कुटुंबीयांना मारहाण करण्यात आली. तसेच त्यांच्या मुलाच्या डोक्यात कोयत्याने देखील वार करण्यात आला होता. आपल्या सोबत घडलेल्या प्रकरणाबाबत पांडुरंग साळुंखे यांनी पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल केली. यानंतर आरोपींने तक्रार दिल्याचा राग मनात धरून ज्ञानेश्वर यांना पुन्हा एकदा मारहाण करण्यात आली. या मारहाणीमुळे झालेल्या वेदना सहन न झाल्याने ज्ञानेश्वर यांनी बंडगार्डन पुलावरून नदीत उडी घेत आपले जीवन संपवले. या प्रकरणाचा अधिक तपास येरवडा पोलीस करत आहेत.