PMP labor unions : पीएमपीच्या अध्यक्षांना कामगार संघनांच्या बैठकीला मिळेना वेळ
अमोल अवचिते
पुणे: पीएमपीच्या प्रवासी संख्येत मोठी वाढ होत आहे. त्यामुळे पीएमपीला आता चांगलेच आर्थिक उत्पन्न मिळू लागले आहे. पीएमपीची बससेवा अधिक सुखकर झाल्याने प्रवासी संख्या वाढत आहे. हे सर्व फक्त नवीन आलेले अध्यक्ष सचिंद्र प्रताप सिंह यांच्या कार्यपध्दतीमुळे शक्य कसे होत आहे, असा गवगवा केला जात आहे. मात्र ज्यांच्या जीवावर पुण्याच्या पीएमपी कारभार चालतो, त्या कर्मचाऱ्यांचे प्रश्न ऐकून घेण्यास पीएमपीच्या अध्यक्षांकडून वेळ दिला जात नाही. असा आरोप कामगार संघटनांनी केला आहे.
पीएमपीच्या अध्यक्षांनी कार्यभार स्वीकारून दोन महिने झाले आहेत. त्यांनी आल्या आल्या कामाचा धडाका सुरु केला. त्यांच्या कार्यपध्दतीमुळे त्यांचे कौतुक केले जात आहे. मात्र कामगारांच्या कोणत्याही प्रश्नांकडे त्यांनी अद्याप पर्यंत लक्ष दिले नाही. त्यामुळे कामगार वर्गातून त्यांच्यावर नाराजी आहे. यापूर्वीच्या अध्यक्षांनी कामगारांचे प्रश्न समजून घेत त्यावर कार्यवाही सुरु केली होती. त्यांच्यामुळे कामगारांना आता न्याय मिळेल, त्यांच्या समस्या सोडवल्या जातील, मागण्या मान्य होतील. असे चित्र निर्माण झाले होते. परंतू कोणत्याही सरकारला कामगारांचे हित साधणारा प्रशासक नको असतो. त्यामुळे त्यांची बदली करुन महामंडळाचे हित साधणाऱ्या अधिकाऱ्याला बसविण्यात आले आहे. असे कामगारांनी नाव न सांगण्याच्या अटीवर "सीविक मिरर" शी बोलताना सांगितले.
काय आहेत कामगारांचे प्रश्न..
- पीएमपीच्या कर्मचाऱ्यांना औद्योगिक रोजगार अधिनियम १९४६ च्या उपविधी कलम ५ नुसार कामाचे सलग २४० दिवस भरल्यानंतर कायम करण्याचे आदेश आहेत, मात्र या कलमाकडे पीएमपीचे दुर्लक्ष
- सुमारे दोन हजार कर्मचारी सेवेत कायम होण्यापासून वंचित
- कर्मचाऱ्यांचा हक्काच्या रजेचा प्रश्न प्रलंबित
- बदली सुट्टी नदेता ५ दिवसांचा आठवडा रद्द
- आजारी पडल्यानंतर कामावर हजर होताना ससूण रुग्णालययाचे मेडिकल प्रमाणपत्र सादर करण्याची सक्ती
- चालक, वाहकांच्या कामांच्या वेळेबाबत कायचा तोडगा काढण्याची गरज
- एक दिवस गैरहजर राहिले तरी निलंबनाची कारवाई करण्यात येते
कर्मचारी म्हणतात...
- महामंडळाचा आर्थिक विकास झाला पाहिजे असा विचार होतो, त्याप्रमाणे कामगारांच्या कल्याणाची देखील विचार करावा
- अनुकंपाखाली घेतलेल्या कामगारांना एका वर्षात सेवेत कायम केले जाते, पण सरळसेवा परीक्षा पास होऊन सेवेत ५ वर्ष झाले तर कायम का केले जात नाही
- २०२० साली काही कामगारांना कायम केले, त्यानंतर पीएमपी का निर्णय घेत नाही
- समान न्यायाचे तत्व का लागू केले जात नाही
- पीएमपीवर आर्थिक बोजा पडत असेल तर टप्प्या टप्याने कायम करावे
पीएमपीचा ताफा
- एकूण २१०० बस
- पीएमपीचे सुमारे २००० रोजंदारीवरील कामगार कायम होण्याच्या प्रतिक्षेत
- पीएमपीचे २००० हून अधिक पदे रिक्त
- २० तो २५ वर्षापासून एकाच पदावर काम, बढतीदेण्यासाठी पीएमपी उदासिन
पीएमपीच्या कामगारांचे प्रश्न मांडण्यासाठी अध्यक्षांनी बैकठ घ्यावी, यामागणीचे पत्र दिले आहे. मात्र त्यांनी अद्याप वेळ दिली नाही. कामगार अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाते. त्याप्रमाणे कामगारांचे प्रश्न देखील ऐकूण घेणे गरजेचे आहे. कामगारांच्या अनेक मागण्या प्रलंबित आहेत. अध्यक्षांनी आता कामगारांच्या हिताचे निर्णय घ्यावेत. बैठकीसाठी वेळ देण्यात यावा.
- सुनिल नलावडे, सरचिटणीस, पीएमपीएमएल, राष्ट्रवादी महाराष्ट्र जनरल कामगार युनियन
कर्मचाऱ्यांच्या समजूनच काम केले पाहिजे. संस्था तोट्यात असल्याने आर्थिक उत्पन वाढीवर केले जात आहे. मात्र जोपर्यंत कर्मचारी आणि संघटनांकडून समस्या समजून घेतल्या शिवाय त्यावर मार्ग काढता येत नाही. संस्था आर्थिक बाबींने सक्षम झाली तरच कर्मतचाऱ्यांचे पोट भरु शकते. मात्र कर्मचाऱ्यांचे प्रश्न समजून घेतले तर नक्कीच संस्था पुढे जाण्यास मदत होईल. यासाठीच चर्चा करण्यासाठी अध्यक्षांकडे वेळ मागितली आहे.
- बबनराव झिंजुर्डे, अध्यक्ष, पीएमपीएमएल कर्मचारी महासंघ
नव्याने कार्यभार स्वीकारल्यानंतर संस्थेचे विषय समजून घ्यावे लागतात. संस्था आर्थिक दृष्ट सक्षम असेल कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडवतात येतात. त्यामुळे आर्थिक उत्पन वाढविण्यावर भर दिला जात आहे. यासोबतच कर्मचाऱ्यांचे प्रश्न समजून घेतले जात आहेत. निवृत्त कर्मचाऱ्यांच्या समस्या सोडविल्या आहेत. कामगारांचे इतर प्रश्न समजून घेत आहे. कामगारांच्या प्रश्नांची जाणीव आहे. सातव्या वेतनाचा फरक कसा द्यावा, या विचार सुरु आहे. कामगार संघटनांची बैठक घेतली जाणार आहे.
- सचिंद्र प्रताप सिंह, व्यवस्थापकीय संचालक, पीएमपी