रक्तसाठा शिल्लक
पुणेकरांची चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे. पुढील १० ते १५ पुरेल एवढाच रक्तसाठा रक्तपेढ्यांमध्ये शिल्लक असल्याचे सांगण्यात आले आहे. सध्या उन्हाळा सुरू असल्याने शहरातील रक्तदान शिबिरांची संख्या कमी झाली आहे. त्यामुळे, पुण्यातील रक्तपेढ्यांमध्ये मर्यादित साठा शिल्लक आहे.
दरवर्षी उन्हाळ्यात रक्तसाठा कमी होतो. त्यानंतर सुरू होणाऱ्या पावसाळ्यात डेंग्यूसारखे आजार उद्भवतात. अशा रुग्णांना बरे होण्यासाठी प्लेटलेट्सची आवश्यकता असते. त्यामुळे पावसाळ्यात प्लेटलेट्स आणि रक्ताची मागणी वाढते. मात्र, मर्यादित साठा शिल्लक राहिल्यामुळे पुणेकरांची चिंता वाढली आहे.
पिंपरीतील यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयाचे रक्त संक्रमण अधिकारी डॉ. शंकर मोसलगी म्हणाले की, “दरवर्षी उन्हाळ्यात रक्ताचा तुटवडा जाणवतो, त्यामुळे यावर्षी एप्रिलमध्ये अधिक शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. मात्र, सध्या पुढील १० ते १५ दिवस पुरेल एवढाच रक्तसाठा शिल्लक आहे. त्यामुळे शिबिरे आयोजित केली जात आहेत.”
ससून रुग्णालयातील रक्तपेढीचे प्रमुख डॉ. सोमनाथ खेडकर म्हणाले, “एप्रिल महिन्यापासून रक्तदान शिबिरांमध्ये घट झाली आहे. त्यामुळे केवळ ५०० रक्ताच्या बॅग शिल्लक आहेत. त्या केवळ पंधरा दिवस टिकू शकते. अधिकाधिक रक्तदान शिबिरे आयोजित केली पाहिजेत आणि लोकांनी रक्तदान केले पाहिजे.”