‘राजकारणात एकतर ते राहतील किंवा मी’ - उद्धव ठाकरे यांचा देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार निशाणा

विधानसभेसाठी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने जोरदार तयारी सुरू केली असून बुधवारी झालेल्या विभाग शिवसेना प्रमुखांच्या बैठकीत उद्धव ठाकरेंनी भारतीय जनता पक्ष आणि देवेंद्र फडणवीसांवर जोरदार टीका केली. लोकसभेत आपण असे नडलो की, पंतप्रधान नरेंद्र मोदींना घाम फोडला, असे प्रतिपादन करत उद्धव ठाकरे म्हणाले की, राजकारणात एकतर ते तरी राहतील किंवा मी राहीन. c

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Desk User
  • Thu, 1 Aug 2024
  • 10:35 am
Uddhav Thackeray's Shiv Sena, Lok Sabha, politics, Bharatiya Janata Party, Prime Minister Narendra Modi

संग्रहित छायाचित्र

मुंबई: विधानसभेसाठी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने जोरदार तयारी सुरू केली असून बुधवारी झालेल्या विभाग शिवसेना प्रमुखांच्या बैठकीत उद्धव ठाकरेंनी भारतीय जनता पक्ष आणि देवेंद्र फडणवीसांवर जोरदार टीका केली. लोकसभेत आपण असे नडलो की, पंतप्रधान नरेंद्र मोदींना घाम फोडला, असे प्रतिपादन करत उद्धव ठाकरे म्हणाले की, राजकारणात एकतर ते तरी राहतील किंवा मी राहीन. उद्धव ठाकरे यांनी नाव घेतले नसले तरी त्यांच्या टीकेचा रोख मात्र देवेंद्र फडणवीस आणि भाजपाकडे होता.   

उद्धव ठाकरे म्हणाले की, आता विधानसभा निवडणुकीत भाजपाची उरली सुरली गुरमीही उतरवू. सगळं सहन करून मी उभा राहिलो. यापुढे राजकारणात एकतर ते तरी राहतील किंवा मी राहिन. सत्तेचा वापर करत मला आणि आदित्य ठाकरेला अडचणीत आणण्याचे षडयंत्र कसे रचले गेले होते, हे अनिल देशमुख यांनी सांगितले आहेत. सगळं सहन करून मी हिंमतीने उभा राहिलो आहे. त्यामुळे राजकारणात एकतर ते तरी राहतील किंवा मी राहीन. आज माझ्याकडे पक्ष चिन्ह, पैसा काहीच नाही.

शिवसैनिकांच्या हिंमतीवर मी आव्हान देत आहे. लोकसभा निवडणुकीत असा नडलो की, पंतप्रधान मोदींनाही घाम फोडला. माझ्या अपेक्षेनुसार मुंबईच्या निवडणुका शेवटच्या टप्प्यापर्यंत लांबल्या असत्या तर त्यांच्या अंगावर कपड्याचे जे काही चार-दोन तुकडे उरले होते, तेही उतरविले असते. शिवसेनेत फूट पडल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी शिवसेना उबाठा गटाला चांगले यश मिळून दिले. त्यानंतर आता शिवसेना उबाठा गटाकडून विधानसभा निवडणुकांची तयारी सुरू करण्यात आली आहे. यासाठी आज मुंबईतील शाखाप्रमुखांची बैठक झाली. त्यात बोलताना ठाकरे यांनी अत्यंत आक्रमक भूमिका घेत भाजपला लक्ष्य केले.

भाजपचा पलटवार 
उद्धव ठाकरेंचे विधान पुढे येताच भाजपाकडून प्रतिक्रियांचा ओघ सुरू झाला आहे. प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांच्यासह भाजपाचे नेते सुधीर मुनगंटीवार, प्रवीण दरेकर, प्रसाद लाड यांनीही लागलीच प्रतिक्रिया दिली. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, तुम्ही अंगावर येण्याची भाषा वापरात आहात. तुम्ही गुरमी उतरविण्याची भाषा वापरता. जनताच तुमची गुरमी उतरविल्याशिवाय राहणार नाही. उद्धव ठाकरे ख्रिश्चन आणि मुस्लीम मतांच्या भरोशावर देवेंद्र फडणवीस यांना बघून घेण्याची भाषा करत आहेत. आज बाळासाहेब ठाकरेंनी त्यांची ही भाषा ऐकली असती, तर त्यांना काय वाटलं असतं याचा विचार आता उद्धव ठाकरे यांनी करायला हवा. खरं तर ते काय बोलत आहेत, त्यांचं त्यांनाही कळत नाही. त्यांच्या निवडून आलेल्या खासदाराच्या मिरवणुकीत पाकिस्तानचे झेंडे फडकतात. फडणवीस यांनी मागच्या काही वर्षात महाराष्ट्राला विकासाच्या दिशेने नेलं आहे.

महाराष्ट्राच्या विकासासाठी त्यांनी प्रयत्न केले आहेत. अशा व्यक्तीवर उद्धव ठाकरे ज्या पद्धतीने बोलत आहेत, त्यावरून त्यांनी मानसिक दिवाळखोरी दिसून येते. उद्धव ठाकरे आता जातीपातीचं आणि धर्माचं राजकारण करण्याचा प्रयत्न करत आहेत. महाराष्ट्राची जनता त्यांना माफ करणार नाही. उद्धव ठाकरे आता खालच्या स्तरावर जाऊन राजकारण करत आहेत. जर-तरची, तसेच बघून घेण्याची भाषा करत आहेत. त्यामुळे जनता त्यांना मतांच्या रुपाने झोडपल्याशिवाय राहणार नाही. अशाप्रकारे चिथावणीची भाषा त्यांना शोभत नाही. त्यांनी त्यांचे संस्कार दाखवून दिले आहेत. हे बाळासाहेब ठाकरेंचे संस्कार आहे का? भारतीय जनता पक्ष आरेला कारे करणारा पक्ष आहे.

Share this story

Latest