पुणे: विसर्जन मिरवणुकीत नागरिकांचे पाच लाखांचे दागिने, ३०० मोबाईल लंपास
पुणे: शहरातील विसर्जन मिरवणुकीत चोरट्यांनी गर्दीचा फायदा घेत हात साफ केला. मिरवणूक पाहण्यासाठी आलेल्या नागरिकांचे ५ लाखांचे सोन्याचे दागिने आणि ३०० मोबाईल लंपास केले. पोलिसांचा तगडा बंदोबस्त, साध्या वेशातील पोलिसांची गस्त, गुन्हे शाखेच्या पोलिसांचा वावर असतानाही चोरट्यांनी आपला डाव साधला. यातील काही चोरट्यांना पोलिसांनी गजाआड केले आहे. या प्रकरणी फरासखाना, विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
विसर्जन मिरवणूक पाहण्यासाठी लक्ष्मी रस्ता, कुमठेकर रस्ता, केळकर रस्ता, टिळक रस्त्यावर मंगळवारी सायंकाळी मोठी गर्दी झाली होती. सर्वाधिक गर्दी लक्ष्मी रस्त्यावर झाली होती. याच काळात चोरटे अधिक सक्रिय झाले होते. या प्रकरणी वारजे माळवाडी येथील रामनगर सोसायटीत राहणाऱ्या ६३ वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे. ही महिला अनंतचतुर्दशीच्या दिवशी श्रीमंत दगडूशेठ गणपती मंदिराकडे दर्शनासाठी जात होत्या. त्यावेळी त्यांची नातही सोबत होती. मुळचंद दुकानाशेजारी भाविकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी झालेली होती. ही महिला या गर्दीतून वाट काढत जात असतानाच अज्ञात चोरट्याने त्यांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने तसेच याच गर्दीमधील आणखी तीन भाविकांच्या गळ्यातील दागिने असा ३ लाख ५२ हजारांचा ऐवज लंपास केला. विश्रामबाग पोलीस ठाण्यात पासोड्या विठोबा मंदिराजवळ राहणाऱ्या ७१ वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे. ही महिला मुलासह घरच्या गणपतीचे विसर्जन करून घरी परतत होत्या. या गर्दीचा फायदा घेत चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील ६० हजारांची सोनसाखळी लांबवली. विश्रांतवाडी येथे राहणारा ३२ वर्षीय तरुण गणेश विसर्जन मिरवणूक पाहण्यासाठी लक्ष्मी रस्त्यावरून जात होता. हुजूरपागा शाळा ते मैत्रीक किड्स शोरूम आणि पुढे बटरफ्लाय शोरूम, सेवासदन चौकादरम्यान चालत जात असताना चोरट्याने त्यांच्या गळ्यातील ९५ हजार सोनसाखळी चोरून नेली.
३०० मोबाईल लंपास
विसर्जन मिरवणुकीत चोरट्यांनी ३०० नागरिकांचे मोबाईल चोरल्याचे समोर आले आहे. फरासखाना, विश्रामबाग, खडक, समर्थसह वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. सर्वाधिक मोबाइल चोरीच्या घटना विश्रामबाग पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडल्या असून मुख्य मिरवणूक मार्गावर चोरट्यांनी ९१ मोबाइल संच चोरले. फरासखाना पोलिसांच्या पथकाने मध्य प्रदेश आणि नाशिकमधील दोन चोरट्यांना गजाआड केले आहे. बेलबाग चौक ते लोकमान्य टिळक चौकात मोबाइल चोरीच्या सर्वाधिक घटना घडल्या. अजीज खान (वय २२,रा. नाशिक) आणि कालू राजू पारख (रा. मध्य प्रदेश) अशी अटक आरोपींची नावे आहेत. उत्सवाच्या कालावधीत दहा दिवसात मध्य भागातून २५ मोबाइल चोरीच्या घटनांची नोंद पोलिसांनी केली. फैजल खान आणि कालू पारख या दोघांकडून २१ मोबाईल हस्तगत करण्यात आल्याचे वरिष्ठ निरीक्षक प्रशांत भस्मे यांनी सांगितले.
महिलांच्या टोळीला अटक
मोबाइल चोरणाऱ्या नाशिक जिल्ह्यातील महिलांच्या टोळीला महिलांनी अटक केली आहे. या महिलांनी नवी मुंबईमध्ये दागिने चोरल्याचे उघडकीस आले. गीता वेंकटेश खट्टी (वय २०), पूजा प्रवीण गाझु (२४, दोघी रा. पाथर्डी, नाशिक) अशी अटक महिलांची नावे आहेत. त्यांच्याकडून नवी मुंबईमधील दहा लाखांच्या चोरीचा गुन्हा उघडकीस आणण्यात यश आले आहे.