चांगल्या हेतूने सुरू केलेले उपक्रम पडले अडगळीत
महेंद्र कोल्हे
पुणे महापालिका एकीकडे रियूज, रेड्यूस, रिसायकल अशा तीन आर च्या (आरआरआर) वापराची मोहिम राबवत आहे. मात्र, अशाच कारणासाठी सुरू केलेली मशिन्स आणि साधनसामग्रीसध्या तुटलेल्या अवस्थेत धूळ खात पडली आहे.
पुणे महानगर पालिकेतील घनकचरा विभाग प्रत्येक वर्षी शहरात राबवण्यासाठी नवीन नवीन उपक्रमाची घोषणा करत असतो. मात्र या घोषणा काही दिवसांनंतर त्यांच्याच स्मरणातून निघू जातात. प्रत्येकवर्षी एखादा नवीन उपक्रम सुरु केला जातो आणि काही महिन्यातच हा उपक्रम ते गुंडाळून ठेवत आहेत. शहराची स्वच्छता आणि सौंदर्यासाठी या नवनवीन योजना आणल्या जातात. मात्र त्याची अमलबजावणी व्यवस्थित होत नसल्याने किंवा त्यामध्ये सातत्य नसल्याने त्या विस्मरणात जातात.
नवीन योजना राबवताना त्यामध्ये सातत्य नसल्याने त्या बंद पडत आहेत. सातत्य असेल तर ज्या अधिकाऱ्यांनी ती आणली आहे त्यांची बदली झाली आणि त्यांच्या जागेवर नवीन अधिकारी आले कि बऱ्याचदा जुने जाऊ द्या मरणा लागूनी अशीच स्थिती पाहावयास मिळत आहे.
महानगरपालिकेने राबवलेला असाच एक स्तुत्य उपक्रम आता अडगळीत पडला आहे. पालिकेने जुन्या वस्तुंचा पुर्नवापर करण्यासाठी नागरिकांकडील जुने कपडे, पुस्तके, प्लॅस्टिकच्या वस्तू, याशिवाय पुनर्वापर आणि पुनर्निर्मित करता येण्याजोग्या इतर वस्तू मिळवण्यासाठी केंद्रे उभारली होती. त्याठिकाणी नागरिकांकडील जुन्या वस्तू दान करण्यास प्रोत्साहित करण्यासाठी संपूर्ण शहरात पुनर्वापर केंद्र उभारण्यात आली. शहरात १५ ठिकाणी ही केंद्रे सुरु केली आहेत. यापुर्वी शहरात अनेक ठिकाणी असलेली प्लास्टिक रिसायकल बुथ, स्वच्छ एटीएमचे बुथ बंद पडली आहेत. आता त्यावर धुळीचे थर जमा झाले आहेत. पालिकेच्या घनकचरा विभागाचे मात्र याकडे संपुर्णपणे दुर्लक्ष झालेले पाहावयास मिळत आहे.