मोबाईलवरून तरुणावर प्राणघातक हल्ला
पुणे : मोबाईल फोन परत न दिल्याच्या कारणावरून झालेल्या वादा मधून तरुणावर प्राणघातक हल्ला करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. आरोपींनी तरुणाला मारताना 'आम्ही इथले भाई आहोत. कोणी आमच्या मध्ये यायचे नाही. कोणी आले तर त्याचा पण कार्यक्रम करू' असे म्हणत दहशत निर्माण केली. ही घटना उरुळी कांचन येथील मौजे दत्तवाडी या ठिकाणी घडली. या प्रकरणी लोणी काळभोर पोलिसांनी (Loni Kalbhor Police) तीन जणांनी विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
वैभव तरंगे (रा. दत्तवाडी, उरुळी कांचन) आणि त्याच्या दोन साथीदाराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी मोहम्मद फिरोज मोहम्मद शरीफ सलमानी (वय २५, रा. दत्तवाडी उरळीकांचन) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादी व आरोपी एकमेकांच्या ओळखीचे आहेत. वैभव तरंगे याने फोन करण्यासाठी मोहम्मद फिरोज यांचा मोबाईल घेतलेला होता. तो मोबाईल फोन परत देत नव्हता. त्यामुळे मोहम्मद फिरोज यांनी तो मोबाईल हातातून ओढून घेतला. त्याचा राग आल्यामुळे वैभव याने फिरोजला मारहाण करायला सुरुवात केली.
त्यावेळी त्यांचा भाऊ मोहम्मद फरीद हा वाचवण्यासाठी आला. त्यावेळी आरोपीने फरीद याच्या डोक्यामध्ये त्याला ठार मारण्याच्या उद्देशाने प्लायवूडची चौकोनी फळी मारली आणि गंभीर जखमी केल. त्यानंतर फिरोज यांना देखील बेदम मारहाण केली. तसेच परिसरात दहशत निर्माण केल्याचे फिर्यादीमध्ये नमूद करण्यात आले आहे.