संग्रहित छायाचित्र
पावसापासून बचाव व्हावा यासाठी एका मजूर अंगावर बॅनर घेऊन झोपला. मात्र अज्ञात वाहनचालकाला तो बॅनरखाली दिसला नाही. डोक्यावरून चाक गेल्याने त्याचा मृत्यू झाला. ही घटना सोमवारी (दि. १) सकाळी साडेनऊ वाजताच्या सुमारास घडली.
कपिल विलास अंकुरे (वय २१, रा. बोरी, परभणी) असे अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या तरुणाचे नाव आहे.
दिघी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक विजय ढमाळ यांनी दिलेल्या माहितीनुसार, दिघी पोलीस ठाण्याच्या हद्दीत आळंदी बस स्टॉप जवळील मोकळ्या मैदानात एकाचा खून झाला असल्याची माहिती अशोक नावाच्या व्यक्तीने पोलीस नियंत्रण कक्षास दिली. घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकार्यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांना एका बॅनरखाली कपिल याचा मृतदेह आढळून आला. मयत व्यक्तीच्या डोक्यावरून चाक गेल्याने त्याचा मृत्यू झाला होता. मयत व्यक्तीच्या अंगावर कोणत्याही मारहाणीच्या खुना नव्हत्या. शवविच्छेदन अहवालात देखील डोक्यावरून चाक गेल्याने मृत्यू झाल्याचे म्हटले आहे.
सध्या पावसाचे दिवस आहेत. त्यामुळे मोलमजुरी करणारे अनेकजण मोकळ्या मैदानाचा आसरा घेताना पावसापासून बचाव करण्यासाठी अंगावर बॅनर घेतात. अशाच प्रकारे मयत कपिल याने अंगावर बॅनर घेतला होता. मात्र अज्ञात वाहन चालकाला बॅनरखाली झोपलेली व्यक्ती दिसली नाही अन् त्या वाहनाचे चाक डोक्यावरून गेल्याने त्याचा मृत्यू झाला. याबाबत दिघी पोलीस अधिक तपास करीत आहेत.