हेमंत करकरेंच्या मृत्यूची चौकशी व्हावी, शशी थरूर यांची मागणी
पुणे : "हुतात्मा हेमंत करकरे यांच्या मृत्यूप्रकरणी माजी पोलिस अधिकारी एस. एम. मुश्रीफ यांनी दिलेली माहिती गंभीर आहे. त्यामुळे या प्रकरणाची त्रयस्थ एजन्सीमार्फत चौकशी झाली पाहिजे," अशी मागणी काँग्रेस नेते शशी थरूर यांनी केली.
शहीद हेमंत करकरे यांचा मृत्यू कसाबच्या गोळीने झालेला नाही, असे वक्तव्य विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केले. त्यावर विचारले असता, थरूर म्हणाले, यामध्ये नेमके तथ्य काय, हे मला माहीत नाही. माजी पोलिस अधिकारी एस.एम. मुश्रीफ यांच्या पुस्तकात तसा उल्लेख आला आहे. त्यामुळे हे गंभीर प्रकरण आहे. करकरे आणि माझे चांगले संबंध होते. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी त्रयस्थ संस्थेमार्फत झाली पाहिजे. जे खरे आहे, ते समोर आले पाहिजे.
या घटनेच्या वेळी केंद्रात आणि राज्यात तुमचेच सरकार होते. त्यावेळी सरकारने चौकशी का केली नाही? असा सवाल केला असता थरूर म्हणाले, आमची सत्ता असताना मुश्रीफ यांनी हे आरोप केले नव्हते. त्यामुळे आम्ही चौकशी करण्याचा प्रश्नच येत नाही.