नरेंद्र मोदी हे ४ जूननंतर पंतप्रधान म्हणून राहणार नाहीत - संजय राऊत
नरेंद्र मोदी नावाचे गृहस्थ आहेत ना, ते ४ जूननंतर देशात पंतप्रधान म्हणून राहणार नाहीत. या देशात आता परिवर्तन होणार असून इथे बसलेल्या सर्व महिलांना स्वयंपाकाचा गॅस चारशे रुपयाला मिळणार आहे, अशी घोषणा संजय राऊत यांनी केली.
मावळ लोकसभेचे (Maval Lok Sabha) शिवसेना (उबाठा) मविआचे उमेदवार संजोग वाघेरे (Sanjog Waghere) यांच्या पिंपरीतील मध्यवर्ती निवडणूक कार्यालयाचे उद्घाटन खासदार राऊत यांच्या हस्ते झाले. यावेळी राऊत (Sanjay Raut) हे सभेत बोलत होते. यावेळी आमदार सचिन अहिर, उमेदवार संजोग वाघेरे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शहरप्रमुख सचिन भोसले, पुणे शहरप्रमुख संजय मोरे, काँग्रेस पक्षाचे कैलास कदम, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे शहराध्यक्ष तुषार कामठे, माजी आमदार गौतम चाबुकस्वार, एकनाथ पवार, योगेश बाबर आदी उपस्थित होते. संजय राऊत म्हणाले की, पार्लमेंटमध्ये मी मोदींना नेहमी सांगत आलोय, तुमचे 'अच्छे दिन' आम्हाला नकोत. तर २०१४ मधील आमचे दिवस आम्हाला परत द्या. जो गॅस आम्हाला साडेचारशे रुपयाला मिळत होता. तेच अच्छे दिवस आम्हाला हवेत. त्यामुळे तुमच्या दहा वर्षात जी लूट केलीय, आम्हाला भिकेला लावले आहे. त्यातून आमची सुटका होईल. देशात कामगार, शेतकरी विरोधी कायदे केले. त्यांना उद्ध्वस्त केले आहे. मोदी हे कामगार, शेतकऱ्यांचा माणूस नाही. तर ते उद्योगपतीचा माणूस आहे. त्यामुळे त्यांनी कामगार विरोधी कायदे करून उद्योगपतींना खूश केले आहे. म्हणून त्यांना मोदीशेठ म्हटले जाते. त्यामुळे आम्हाला मोदींचे राज्य नको. मोदींना आगा ना पिछा, त्यांना संसार, कुटुंब काय कळणार आहे. मोदी हा खोटारडा माणूस आहे. काँग्रेसच्या जाहीरनाम्यात जी गोष्ट नाही, ती त्या घुसडून लोकांना सांगितले. मोदींनी सांगितले देशाची अधिक संपत्ती ही जास्त मुले असणाऱ्यांना वाटणार असल्याचे सांगून हिंदू - मुस्लीम वाद निर्माण करण्याचा प्रयत्न केला. (Lok Sabha Election 2024)
महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र इंडियावाले खेचतात. आमची मंगळसूत्र इतकी स्वस्त आहेत का, हिंदू म्हणून सांगतो, मोदींच्या (Narendra Modi) दहा वर्षात मंगळसूत्र संकटात आली आहेत. देशात सगळ्यात जास्त मंगळसूत्र हे अधिक संकटात आली. नोटबंदी, लाॅकडाऊन सारख्या स्थितीत मुलांची शिक्षणास, आरोग्य, घर चालविण्यासाठी मंगळसूत्र विकावी लागली. काही वेळा गहाण ठेवावी लागली. असा माणूस देशाला लागलेला शाप आहे. त्यामुळे आम्हाला देशावरचे संकट कळले, आम्ही म्हणून बाहेर पडलो. आता देश वाचविण्यासाठी आपल्या संगळ्याना एकत्र येऊन समाज उभा करायचा आहे. देशातील हूकूमशाही थांबवायची आहे. डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांचे संविधान नष्ट करण्यासाठी मोदीला चारशे पार जागा हव्या आहेत. पण, आम्ही म्हणतोय, अब की पार, भाजपा तडीपार, करायची वेळ आली आहे. भविष्यात मुंबई तोडायची आहे. ती गुजरातला घेऊन जायची आहे. आपले उद्योगधंदे, कार्यालये गुजरात घेऊन जाणार आहे. त्यामुळे आपण मावळ लोकसभेला शिवसेनेला प्रचंड मताने विजयी करावे, असेही आवाहन राऊत यांनी केले.
देहू-आळंदीत खाण्या-पिण्याची व्यवस्था होईल
'मै तो फकीर हू, झोला लेकर आया हू, झोला लेकर जाऊंगा', मावळच्या संजोग वाघेरेंनी खासदार म्हणून विजय झाल्यावर मोदींना एक झोला घेऊन द्यावा. त्यांनी झोला घेऊन देहू-आळंदीत येऊन बसावे, त्यांच्या खाण्या- पिण्याची व्यवस्था मोफत पूर्ण होईल. जे हवे ते करा, पण या देशाला तुमच्या जाचातून मुक्त करा, त्याची जबाबदारी संजोग वाघेरे यांच्यावर टाकू या, असेही संजय राऊत यांनी मोदीवर टीकास्त्र सोडले.
मावळात बापाला अन् बारामतीत पतीला फिरावे लागतेय
मावळचे खासदार श्रीरंग बारणे (Shrirang Barne) यांनी २०१९ च्या निवडणुकीत अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांचा मोठ्या मताधिक्याने पराभव केला होता आणि आज त्याच श्रीरंग बारणे यांच्या प्रचारासाठी अजित पवार मावळला आले होते. इतकेच नाही तर मावळमध्ये श्रीरंग बारणे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी अजित पवार बारणे यांच्या रॅलीत सहभागी झाले होते. यामुळे मावळमध्ये बापाला आणि बारामतीमध्ये पतीला प्रचारात उतरावे लागते याचा अर्थ पराभव नक्की आहे, असे म्हणत संजय राऊत यांनी अजित पवारांनाही टोला लगावला आहे.