बारामतीत उमेदवार का दिला नाही? प्रकाश आंबेडकर म्हणाले...
लोकसभा निवडणुकीची घोषणा झाल्यावर वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडीसोबत जाणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या. परंतु जागांचा तिढा न सुटल्याने 'वंचित'ने एकट्याने निवडणुकीला सामोरे जाण्याचे ठरवले. पुणे, शिरूर आणि मावळ लोकसभा मतदारसंघातून वंचितकडून उमेदवार देण्यात आले आहेत. मात्र बारामतीमधून उमेदवार न देण्याचा निर्णय घेतल्याने सर्वांच्याच भुवया उंचवल्या होत्या. आज पुण्यात वसंत मोरे यांच्या प्रचारार्थ प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी बोलताना त्यांनी बारामतीत उमेदवार न देण्याबाबतचा खुलासा केला आहे.
शिरूर लोकसभा मतदारसंघातून उमेदवार दिला मात्र बारामतीमधून उमेदवार का दिला नाही याचा असे विचारले असता वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर म्हणाले, बारामतीमध्ये उमेदवार देण्याबाबत शरद पवार यांच्याशी चर्चा झाली नाही. परंतु सुप्रिया सुळे भेटल्या होत्या. त्या कुठे भेटल्या होत्या त्याचा काळ-वेळ विचारू नका. हा निर्णय भावनिक होवून न घेता भविष्यातील काही राजकीय धोरणं लक्षात घेऊन घेतला आहे. काही निर्णय भावूक न होता, धोरणाच्या दृष्टिकोनातून घ्यायचे असतात.
आंबेडकर पुढे म्हणाले, कोल्हापूरच्या छत्रपतींना पाठिंबा देण्याची चर्चा सुरू होती. तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी संवाद साधला होता. त्यावेळी पाटील म्हणाले होते की, आमची लढाई मोठी आहे. तुम्ही आमच्या बाजून आहात असं दाखवा. त्यामुळे बारामतीमध्ये उमेदवार न देण्याचा निर्णय आम्ही घेतला.