Pakistan Prime Minister
जम्मू-काश्मीरच्या पहलगाम भागात मंगळवारी (दि. 22 ) दुपारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये पुन्हा एकदा तणाव निर्माण झाला आहे. या दहशतवादी हल्ल्यानंतर केंद्र सरकारही आक्रमक झाले असून पाकिस्तानविरोधात शड्डू ठोकला आहे. या दहशतवादी हल्ल्यासाठी भारताने पाकिस्तानला जबाबदार धरले आहे. मात्र, पाकिस्तानने या हल्ल्याची जबाबदारी घेणे टाळले. या हल्ल्याशी आमचा काहीही संबंध नसल्याचे पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा असिफ म्हणाले आहेत. आता या ही पुढे जाऊन पाकिस्तानचे पंतप्रधान शेहबाज शरीफ यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. पाकिस्तान या हल्ल्याप्रकरणी तटस्थ चौकशीला तयार असल्याचे ते म्हणाले आहेत.
पहलगाम येथे झालेला हा हल्ला पाकिस्ताननेच केल्याचा दावा भारताने तांत्रिक बुद्धिमत्ता आणि विश्वसनीय माहितीच्या आधारावर केला आहे. या दाव्यानंतर पाकिस्ताने आपली भूमिका स्पष्ट केली. शहबाज शरीफ म्हणाले की, भारताने आरोप-प्रत्यारोपाचा खेळ बंद करावा. भारताच्या कुठल्याही हल्ल्याला आम्ही ताकदीने उत्तर देऊ. पाकिस्तानला शांतता हवी परंतु आम्ही शांत आहोत म्हणजे कमकुवत समजू नका. जर भारताने सिंधु नदीचं पाणी थांबवण्याचा प्रयत्न केला तर आम्हीही त्याला ताकदीने प्रत्युत्तर देऊ. पहलगाम हल्ल्याच्या तटस्थ चौकशीला आम्ही तयार आहोत.