इस्लामाबाद : एका बाजूला सिंधू पाणी कराराच्या संभाव्य परिणामांमुळे पाकिस्तानला देशात दुष्काळाची भीती वाटत आहे, तर दुसरीकडे पाण्यावरून पाकिस्तानातच अंतर्गत संघर्ष पेटला आहे. सत्ताधारी पक्षाचा प्रमुख मित्रपक्ष असलेल्या पाकिस्तान पीपल्स पार्टीने (पीपीपी) आघाडी सरकारमधून बाहेर पडण्याचा इशारा दिला आहे. पाकिस्तान पीपल्स पार्टीचे म्हणणे आहे की, आगामी कौन्सिल ऑफ कॉमन इंटरेस्टच्या (सीसीआय) बैठकीत जर कालव्याचा मुद्दा सोडवला गेला नाही, तर पीपीपी आपला पाठिंबा काढून घेईल.
पाकिस्तानच्या पंजाब प्रांताने सिंधू नदीवर ६ कालवे बांधण्याचा प्रस्ताव मांडला आहे, ज्यामुळे नदीचे पाणी पंजाबमधील शेतकऱ्यांना उपलब्ध होऊ शकेल. मात्र, सिंध प्रांत या प्रस्तावाच्या तीव्र विरोधात आहे. पाकिस्तान पीपल्स पार्टीदेखील सिंधच्या लोकांच्या समर्थनार्थ उभी राहिली आहे. पीपीपीच्या मते, जर पंजाबमध्ये नदीवर कालवे बांधले गेले, तर सिंध प्रांतात पाण्याची कमतरता निर्माण होईल. हा वाद सोडवण्यासाठी पाकिस्तान सरकारने २ मे रोजी सीसीआयची बैठक बोलावली आहे.
स्थानिक माध्यमांच्या वृत्तानुसार, पीपीपीचे सिंध प्रांताचे ऊर्जामंत्री नासिर शाह यांनी पाकिस्तान सरकारला पाठिंबा काढून घेण्याचा इशारा दिला आहे. नासिर शाह म्हणाले की, जर सीसीआयच्या बैठकीत कालव्याचा प्रश्न सुटला नाही, तर आमचा पक्ष सरकारमधून बाहेर पडेल. 'द एक्सप्रेस ट्रिब्यून'च्या वृत्तानुसार, नासिर शाह यांनी मुत्ताहिद कौमी मूव्हमेंट पाकिस्तानच्या (एमक्यूएम-पी) नेत्यांचीही भेट घेतली आहे. नासिर यांनी मुत्ताहिद कौमी मूव्हमेंट पाकिस्तानला आगामी पोटनिवडणुकीत आपले उमेदवार उभे न करण्याची विनंती केली आहे. कालवा प्रकल्पावर बोलताना नासिर शाह म्हणाले की, ही सिंधच्या लोकांसाठी अत्यंत महत्त्वाची समस्या आहे. या प्रश्नाने सर्वांना एकत्र आणले आहे. या मुद्द्यावर सर्वांचे एकमत आहे.मुत्ताहिद कौमी मूव्हमेंट पाकिस्ताननेही या मुद्यावर पीपीपीला पाठिंबा जाहीर केला आहे. नासिर शाह यांनी पाकिस्तानी सरकारला धमकीवजा इशारा देताना म्हटले, आम्हाला माहित आहे की जर पीपीपीने सरकारचा पाठिंबा काढला, तर सरकार कोसळेल. त्यामुळे आम्ही आशा करतो की सरकार कालव्याच्या मुद्द्यावर दिलेले आपले आश्वासन पूर्ण करेल.