‘एआय’ ला आवरा अन्यथा...
#न्यूयॉर्क
सध्या जगभरात आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा (एआय) वापर जोरात होत आहे. किमान मनुष्यबळाच्या जोरावर जास्तीत जास्त नफा कमावणाऱ्या कंपन्यांना एआय अधिक लाभदायक ठरणार आहे, त्यामुळे या कंपन्या या तंत्रज्ञानाकडे सकारात्मक दृष्टीकोनातून बघत आहेत, त्यामुळे जगभरात मानवी हातांना काम मिल्ने अवघड होणार आहे. या पार्श्वभूमीवर भारतीय वंशाच्या ख्यातनाम अर्थशास्त्रज्ञ आणि आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या उपव्यवस्थापकीय संचालक गीता गोपीनाथ यांनी कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे आगामी काळात अनेक समस्या निर्माण होण्याची भीती व्यक्त केली आहे.
गीता गोपीनाथ या मंगळवारी (६ जून) सिलिकॉन व्हॅली येथील कार्यक्रमात बोलत होत्या. या तंत्रज्ञानावर नियंत्रण ठेवण्यासाठी लवकरात लवकर नियम बनवावेत, असे आवाहन त्यांनी जगभरातील धोरणकर्त्यांना केले आहे. आज जगभरातील विविध कंपन्यांना कृत्रिम बुद्धीमत्ता तंत्रज्ञानाचा मोह वाटतो आहे, मात्र यांच्या दुष्परिणामांकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. जगातील सर्वच राज्यसंस्था आणि धोरणकर्त्यांनी एआय या तंत्रज्ञानाचे दुष्परिणाम टाळण्यासाठी नियम बनवावेत. श्रम बाजारात कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे निर्माण होणाऱ्या समस्येला तोंड देण्यासाठी लवकरात लवकर ठोस उपाययोजना राबवावी. धोरण राबवणाऱ्यांनी कृत्रिम बुद्धिमत्ता तयार करणाऱ्या कंपन्यांपासून सावध रहायला हवे, असे आवाहन त्यांनी केले आहे.
यापूर्वी मार्च २०१३ मध्ये गोल्डमन सॅक्सने आपल्या अहवालात म्हटले होते की, कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे ३०० दशलक्ष नोकऱ्या धोक्यात येऊ शकतात. गेल्या वर्षी, पीडब्ल्यूसी या वित्तीय संस्थेने आपल्या जागतिक मनुष्यबळ पाहणी अहवालात, येत्या तीन वर्षांत एक तृतीयांश लोकांचा रोजगार एआयमुळे जाणार असल्याची शक्यता व्यक्त केली होती. तंत्रज्ञानाशी संबंधित बर्याच कंपन्या एआयमुळे नोकरकपात करत आहेत, अथवा भरती प्रक्रिया थांबत आहेत.
आयबीएम कंपनीनेही ७८०० लोकांची भरती एआयच्या भरवश्यावर थांबवली आहे.
वृत्तसंस्था