IPL 2025 (PBKS vs KKR, Match 31) | रोमांचक सामन्यात पंजाब किंग्जनं केकेआरचा केला पराभव, गोलंदाजांच्या बळावर मिळवला शानदार विजय...

फिरकी गोलंदाज युजवेंद्र चहलच्या शानदार गोलंदाजीच्या जोरावर पंजाब किंग्जने केकेआरचा १६ धावांनी पराभव केला आणि आयपीएलच्या इतिहासातील सर्वात कमी लक्ष्याचा यशस्वीरित्या बचाव केला.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Desk User
  • Wed, 16 Apr 2025
  • 12:17 pm
IPL 2025 news, Sport news, Cricket news,

IPL 2025 | PBKS vs KKR Highlights....

IPL 2025 (PBKS vs KKR, Match 31 Highlights) : फिरकी गोलंदाज युजवेंद्र चहलच्या नेतृत्वाखालील गोलंदाजांच्या शानदार कामगिरीमुळे पंजाब किंग्जने कोलकाता नाईट रायडर्स (केकेआर) चा १६ धावांनी पराभव केला. या सामन्यात पंजाबने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करत १५.३ षटकांत १११ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात, संपूर्ण केकेआर संघ १५.१ षटकांत ९५ धावांवर गारद झाला.

पंजाब किंग्जने आयपीएलच्या इतिहासातील सर्वात कमी धावसंख्येचा बचाव केला. मंगळवारी मुल्लानपूरमध्ये यजमान संघाला फक्त १११ धावा करता आल्या, पण त्यांनी गोलंदाजीत पुनरागमन केले आणि कोलकाता नाईट रायडर्सला ९५ धावांवर गुंडाळले. पंजाबपूर्वी २००९ मध्ये चेन्नई सुपर किंग्जने ११६ धावांचा बचाव केला होता. तेव्हा पंजाबला सीएसकेविरुद्ध फक्त ९२ धावा करता आल्या.

लक्ष्याचा पाठलाग करताना केकेआरची सुरूवात चांगली झाली नाही आणि त्यांनी पहिल्या दोन षटकातच दोन विकेट गमावल्या. सुनील नरेन ४ चेंडूत ५ धावा काढून तर क्विंटन डी कॉक ४ चेंडूत २ धावा काढून बाद झाला. त्यानंतर कर्णधार अजिंक्य रहाणेने प्रभावशाली खेळाडू अंगकृष रघुवंशीसोबत तिसऱ्या विकेटसाठी ५५ धावांची भागीदारी केली पण ही भागीदारी तुटताच केकेआरचा डाव पत्त्यांच्या गठ्ठ्यासारखा कोसळला. शेवटी, आंद्रे रसेलने काही मोठे फटके खेळून संघाला विजय मिळवून देण्याचा निश्चितच प्रयत्न केला, परंतु दुसऱ्या टोकाकडून सतत विकेट पडल्यामुळे त्याला त्याच्या प्रयत्नानां यश आले नाही.

केकेआरकडून रघुवंशीने सर्वाधिक ३७ धावा केल्या, तर रहाणेने १७ आणि रसेलने १७ धावा केल्या. या तीन फलंदाजांव्यतिरिक्त, केकेआरचा कोणताही फलंदाज दुहेरी आकडा गाठू शकला नाही, तर त्यांच्या तीन फलंदाजांना त्यांचे खातेही उघडता आले नाही. पंजाबकडून चहलने शानदार कामगिरी केली. या हंगामात त्याला आतापर्यंत काही खास कामगिरी करता आलेली नाही, परंतु त्याने या सामन्यात दमदार कामगिरी केली. चहलने आयपीएलमध्ये आठ वेळा एका सामन्यात चार किंवा त्याहून अधिक विकेट्स घेतल्या आहेत आणि या बाबतीत त्याने सुनील नरेनची बरोबरी केली आहे.

चहलनं फिरवला सामना....

पंजाब किंग्जकडून गोलंदाजीत युजवेंद्र चहलने  ४ षटकांत २८ धावा देत  सर्वाधिक ४ विकेट्स घेत सामना पार बदलून टाकला. त्याने अजिंक्य रहाणे, अंगक्रिश रघुवंशी, रिंकू सिंग आणि रमणदीप सिंग यांना पॅव्हेलियनमध्ये पाठवले. मार्को जॅनसेननेही ३ महत्त्वाच्या विकेट्स घेतल्या. चहलच्या गोलंदाजीमुळेच पंजाबने सामन्यात पुनरागमन केले आणि विजयही नोंदवला. या कामगिरीसाठी चहलला सामनावीर म्हणून गौरविण्यात आलं.

तत्पूर्वी, पंजाबने या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, परंतु केकेआरच्या गोलंदाजांनी शानदार गोलंदाजी केली ज्यामुळे पंजाब संघ पूर्ण २० षटकेही खेळू शकला नाही आणि १५.३ षटकांत १११ धावसंख्येवर सर्वबाद झाला. पंजाबकडून सलामीवीर प्रभसिमरन सिंगने सर्वाधिक धावा केल्या. प्रभसिमरन सिंगने १५ चेंडूत दोन चौकार आणि तीन षटकारांच्या मदतीने ३० धावा केल्या.

प्रथम फलंदाजी करताना प्रभसिमरन आणि प्रियांश आर्य यांनी संघाला चांगली सुरुवात करून दिली आणि संघाने अवघ्या तीन षटकांत ३० धावांचा टप्पा ओलांडला होता. तथापि, चौथे षटक टाकण्यासाठी आलेल्या हर्षितने प्रियांशला बाद करून पंजाबला पहिला धक्का दिला. प्रियांश १२ चेंडूत तीन चौकार आणि एका षटकारासह २२ धावा काढून बाद झाला. येथून पंजाबचा डाव डळमळीत झाला आणि त्यांनी नियमित अंतराने विकेट गमावल्या. चांगल्या फॉर्ममध्ये असलेला कर्णधार श्रेयस अय्यरला खातेही उघडता आले नाही.

पंजाबची फलंदाजी इतकी खराब होती की संघाचे फक्त पाच फलंदाजच दुहेरी आकडा गाठू शकले. पंजाबकडून शशांक सिंगने १८ धावा केल्या, ज्यामुळे संघाला १०० च्या पुढे धावसंख्या उभारता आली. याशिवाय झेवियर बार्टलेटने ११, नेहल वधेरानं १०, ग्लेन मॅक्सवेलने सात, सूर्यांश शेडगेनं  चार आणि मार्को जानसेन यानं एक धाव केली. दरम्यान, अर्शदीप सिंग एक धाव काढून नाबाद परतला. केकेआरकडून गोलंदाजीत हर्षित सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला ज्याने तीन षटकांत २५ धावा देत तीन बळी घेतले. त्याच्याशिवाय वरुण चक्रवर्ती आणि सुनील नारायण यांनी प्रत्येकी दोन, तर वैभव अरोरा आणि अँरिच नोर्टजे यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.

Share this story

Latest