'गंगाजल शुद्धच आहे..पण काहींच्या विचारांचे काय?', बॅनर झळकावत शिंदे गटाने राज ठाकरेंना डिवचलं

प्रयागराज येथे झालेल्या कुंभमेळ्यानंतर मनसे पक्ष प्रमुख राज ठाकरे यांनी गंगा नदीतील पाण्याच्या शुद्धतेविषयी अनेकदा प्रश्न उपस्थित केला आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Dhanshri Otari
  • Wed, 2 Apr 2025
  • 08:49 am

प्रयागराज येथे झालेल्या कुंभमेळ्यानंतर मनसे पक्ष प्रमुख राज ठाकरे यांनी गंगा नदीतील पाण्याच्या शुद्धतेविषयी अनेकदा प्रश्न उपस्थित केला आहे. गुढी पाडव्या दिवशीही झालेल्या मेळाव्यात गंगा नदीतील पाण्यावर भाष्य केले होते. दरम्यान, याच मुद्यावरुन शिंदे गटाने 'गंगाजल शुद्धच आहे..पण काहींच्या विचारांचे काय?', असा सवाल उपस्थित करत राज ठाकरेंना डिवचलं आहे. त्यामुळं राज ठाकरे काय उत्तर देणार? याकडे सर्वाचे लक्ष लागलं आहे. 

विधानसभा निवडणुकीत माहीम मतदारसंघात अमित ठाकरेंचा पराभव करणारे समाधान सरवणकर यांनी  शिवसेना भवनासमोर कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर भलं मोठे बॅनर झळकावले आहे.  'गंगाजल शुद्धच आहे, पण काहींच्या विचारांचं काय?', असा सवाल समाधान सरवणकर यांनी लावलेल्या बॅनवर  उपस्थित करण्यात आला आहे. 

बॅनरवर नेमका मजकुर काय?

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसैनिकांची कुंभमेळ्यातील काही छायाचित्र बॅनरवर लावण्यात आली आहेत. 144 वर्षांनी आलेल्या दिव्य महाकुंभ सोहळ्यात जगभरातील 60 कोटींहून अधिक हिंदू बांधव सहभागी झाले होते. त्यांनी त्रिवेणी संगमात स्नान करुन अखंड हिंदू एकात्मतेचा संदेश दिला. कुंभमेळा हे केवळ श्रद्धेचे नव्हे तर हिंदू संस्कृतीच्या गौरवशाली भव्यतेचे जिवंत प्रतीक आहे. हा क्षण  अभिमानाचा आणि गौरवाचा होता. हा क्षण हिंदुंच्या एकजुटीचा होता, असा मजकूर बॅनरव लिहण्यात आला आहे. 

तसेच गंगाजल शुद्धच आहे, पण काही लोकांच्या विचारांचं काय, असा सवाल विचारत समाधान सरवणकर यांनी राज ठाकरेंच्या नावाचा उल्लेख न करत डिवचलं आहे. यासोबतच सरवणकर यांनी राज ठाकेंवर अप्रत्यक्षपणे टीका करताना कडवट हिंदुत्त्वाचा पुरस्कारही केला आहे.

राज ठाकरे नेमकं काय म्हणाले?

बाळा नांदगावकर कुंभमेळ्यातून येताना माझ्यासाठी गंगाजल घेऊन आले होते. मात्र, पण ते पाणी मी प्यायलो नाही. त्यावेळी मग नव्याने वारं शिरलेल्या हिंदुत्ववाद्यांना वाटलं की, मी कुंभमेळ्याचा अपमान केला म्हणाले की कुंभमेळ्याचा अपमान केला. आपल्या देशातील नद्यांची अवस्था भीषण झाली आहे. कुंभमेळ्यासाठी कोट्यवधी लोक गेले होते. या लोकांची विष्ठा नदीच्या पाण्यात मिसळली असेल. मग ते पाणी शुद्ध कसं असू शकतं, असा सवाल राज ठाकरे यांनी उपस्थित केला होता.

कुंभमेळ्यात अंघोळ केल्यावर लाखो लोक आजारी पडले आहेत. हे मला उत्तर प्रदेशातल्या लोकांनीच सांगितलं. गंगेवरची काय परिस्थिती आहे? कुंभमेळ्याच्या अपमानाचा प्रश्न नाही. प्रश्न पाण्याचा आहे. पण आपल्या नैसर्गिक गोष्टींवर अशाप्रकारचा धर्म आढवा येत असेल तर, या धर्माचं काय करायचं. आपल्या गोष्टीत आपण बदल करायला पाहिजे, असे राज ठाकरे यांनी म्हटले होते.

Share this story

Latest