Congress leader Vijay wadettiwar slam mahayuti
'उद्धवजींना संपवून शिंदेजींना आणलं. आता शिंदेंना संपवून एक नवीन उदय पुढे येईल,...' असं मोठं विधान काँग्रेसच्या बड्या नेत्याने केल्यानं राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ माजली आहे. गेल्या काही दिवसांपासून भाजपच्या हाती सत्ता आल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना डावलन्याचा प्रयत्न भाजपकडून सुरु असल्याचा आरोप विरोधक सातत्याने करताना दिसत आहेत. अशातच काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी महायुतीवर निशाणा साधला.
राज्यात पालकमंत्री पदाची यादी जाहीर होताच एकनाथ शिंदे त्यांच्या गावाला निघून गेले. त्यांच्या या भूमिकेनंतर अनेक तर्क वितर्क लावण्यात येत आहेत. अशातच विजय वडेट्टीवार यांनी शिंदेंच्या भूमिकेवर मोठं वक्तव्य केलं.
नेमकं काय म्हणाले विजय वडेट्टीवार?
“मी शब्द वापरला, तर चुकीचा अर्थ निघेल. शिंदे साहेबांची गरज संपली का? असा संतप्त सवाल उपस्थित करत मला भिती वाटते की, उद्धवजींना संपवून शिंदेजींना आणलं. आता शिंदेंना संपवून एक नवीन उदय पुढे येईल. तो उदय कुठला असेल?. त्याला पुढे आणण्याचा प्रयत्न होईल. ही सुद्धा स्थिती महाराष्ट्रात येईल” असं ते म्हणाले. त्यावर माध्यमांनी त्यांना उलट सवाल उपस्थित केला की, तुम्ही उदय सामंत यांच्याबद्दल बोलत आहात का?. “तुम्हाला उद्या शिवसेनेत तिसरा नवीन उदय दिसेल. ही शक्यता नाकारता येत नाही. कारण ते दोन्ही दगडावर हात मारुन आहेत” असं वडेट्टीवार म्हणाले.
तसेच, वडेट्टीवार यांनी महायुतीमध्ये पालकमंत्री पदावरुन सुरु असलेल्या नाराजीनाट्यावरही भाष्य केलं. 'सगळी परिस्थिती पाहून सरकारला जनता स्थगिती देईल असं वाटायला लागलय. इतकं मोठ बहुमत मिळालं, तुम्ही सांगत होता. स्वातंत्र्यानंतर कधीच मिळालं नव्हतं. आपसातले मतभेद, भांडण इतकी वाढली आहेत की, सत्तेसाठी, खुर्चीसाठी भांडण. त्यातून पैसा मिळवण्याची स्पर्धा सुरु आहे. पालकमंत्री नेमताना, मंत्री नेमताना भांडण. नांदा सौख्य भरे तसं आता भांडा सौख्यभरे म्हण्याची वेळ आली आहे.' अशा शब्दात निशाणा साधत वडेट्टीवार पुढे म्हणाले, भांडा आणि महाराष्ट्राच वाटोळ करां. आता पालकमंत्री बदललेत. उद्या मंत्री बदलायची पाळी येईल. परवा उपमुख्यमंत्री नंतर मुख्यमंत्री बदलायची पाळी येईल. अशी भीती व्यक्त करत बदला आणि महाराष्ट्राच वाटोळं करा अशा शब्दात वडेट्टीवार यांनी राज्य सरकारला सुनावले.