संग्रहीत छायाचित्र
नवी दिल्ली - दिल्लीचे माजी मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल बिहार आणि उत्तर प्रदेशातील लोकांवर नकारात्मक टिप्पणी केल्यामुळे अडचणीत सापडले आहेत. त्याच्यावर पाटणा दिवाणी न्यायालयात खटला दाखल झाल्यामुळे त्यांच्या अडचणी वाढू शकतात. या प्रकरणाची पुढील सुनावणी मंगळवारी होईल, असे वकील ऋषिकेश नारायण सिन्हा यांनी सांगितले. ही तक्रार अॅडव्होकेट बीके कात्याल यांनी दाखल केली आहे.
वकील ऋषिकेश नारायण सिंह यांनी सांगितले की, बीएनएसच्या कलम ३५६ अंतर्गत पाटणा दिवाणी न्यायालयात तक्रार दाखल करण्यात आली आहे. मंगळवारी मुख्य न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयात यावर सुनावणी होणार आहे. दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी वादग्रस्त विधान करून बिहार आणि उत्तर प्रदेशातील लोकांचा अपमान केला आहे. बिहारचे लोक खूप मेहनती आहेत. केजरीवाल यांना मुख्यमंत्री बनवण्यात बिहार आणि उत्तर प्रदेशातील लोकांची महत्त्वाची भूमिका आहे. या लोकांनी त्यांना मतदान केले आणि त्यांचे सरकार स्थापन केले. आम्ही कष्टाळू लोक आहोत आणि इतरांचा आदर करतो. केजरीवाल यांनी वापरलेली भाषा योग्य नाही. यासाठी त्यांनी देशाची आणि विशेषतः बिहार आणि उत्तर प्रदेशातील लोकांचे पाय धरून माफी मागितली पाहिजे, असेही ते म्हणाले.
दरम्यान, ९ जानेवारी रोजी अरविंद केजरीवाल यांनी भाजपवर हल्लाबोल करताना म्हटले होते की, बिहार आणि उत्तर प्रदेशातील लोकांना आणून बनावट मतदार बनवले जाते. गेल्या १५ दिवसांत दिल्लीत १३,००० नवीन मतदार जोडले गेले आहेत, असा दावा त्यांनी केला होता. त्यांनी या मतदारांना बनावट म्हणटल्यामुळे देशभरात राजकीय गोंधळ उडाला होता. मीडिया रिपोर्ट्सनुसार, या प्रकरणात अरविंद केजरीवाल यांच्याविरुद्ध आतापर्यंत ११ गुन्हे दाखल झाले आहेत.