हिंदूंनी तीन मुले जन्माला घालण्याचे सरसंघचालक मोहन भागवतचे विधान; अविमुक्तेश्वरानंद यांची जोरदार टीका टीकास्त्र
बरेली : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी हिंदूंना तीन मुले जन्माला घालण्याचे केलेले आवाहन वादात सापडले आहे. ज्योतिषपीठाचे शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी या विधानाचा खरपूस समाचार घेत भागवत यांच्यावर टीका केली आहे. “हिंदूंची लोकसंख्या वाढवणे इतकेच महत्त्वाचे असेल, तर मोहन भागवत आणि त्यांचे प्रचारक स्वतः लग्न का करत नाहीत?” असा रोखठोक सवाल शंकराचार्यांनी विचारला आहे.
बरेली येथील एका कार्यक्रमात बोलताना शंकराचार्य म्हणाले की, “आचार्य तोच असतो जो स्वतः गोष्टी आचरणात आणतो. एकीकडे सरकार लोकसंख्येचा स्फोट होत असल्याचे सांगते, तर दुसरीकडे आरएसएस लोकसंख्या वाढवण्याच्या गप्पा मारते. जर तुम्हाला हे कार्य इतकेच मोठे वाटत असेल, तर त्याचे ओझे दुसऱ्यांवर का टाकता? आधी स्वतः लग्न करा, मुले जन्माला घाला आणि मग जगाला सल्ले द्या.” सत्तेत बसलेले लोक आता स्वतःच ‘धर्माचार्य’ बनू पाहत आहेत, असा टोलाही त्यांनी लगावला.
शंकराचार्यांनी केवळ भागवतच नव्हे, तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरही निशाणा साधला. इराण, अमेरिका आणि इस्रायल यांच्यातील युद्धावर बोलताना ते म्हणाले की, “युद्धाच्या वेळी न्याय आणि अन्याय अशा दोन बाजू असतात. विद्वानांनी न्यायाची बाजू ठामपणे मांडली पाहिजे. मात्र, पंतप्रधान मोदी या विषयावर गप्प आहेत. त्यांचे हे मौन संभ्रम निर्माण करणारे आहे.”
युद्धामुळे वाढलेली महागाई आणि गॅस सिलिंडरचा तुटवडा यावर भाष्य करताना त्यांनी खंत व्यक्त केली. “पंतप्रधानांच्या बंगल्याची वीज जात नाही किंवा त्यांचे रेशन कमी होत नाही, त्यामुळे त्यांना जनतेच्या त्रासाचे सोयरसुतक उरलेले नाही,” अशी टीकाही त्यांनी यावेळी केली.


