Mithun Chakraborty's allegations on violence in West Bengal
पश्चिम बंगालमध्ये झालेल्या हिंसाचाराला ममता बॅनर्जी जबाबदार आहेत. त्यांच्या नाकर्तेपणामुळे बंगालमधील हिंदूंना बेघर व्हावे लागत असून सत्ता मिळवण्यासाठी ममता बॅनर्जी हिंदू आणि मुस्लीम समुदायांना संभ्रमात टाकत आहेत. हिंदूंकडे पाहण्याचा त्यांचा दृष्टीकोन निकोप नाही. बंगालमधी हिंदूंच्या हाल-अपेष्टांना त्यांचे सरकार कारणीभूत असल्याचा निशाणा ज्येष्ठ अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांनी साधला आहे.
मुर्शिदाबाद जिल्ह्यात ११ आणि १२ एप्रिल रोजी उसळलेल्या हिंसाचारात हिंदूंना बेघर व्हावे लागले आहे. छावण्यांमध्ये त्यांच्यावर खिचडी खाऊन दिवस काढावे लागत आहेत. यासाठी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी जबाबदार असल्याचा आरोप चक्रवर्ती यांनी केला आहे. ममता या बंगाली हिंदू समाजासाठी धोका बनल्या आहेत. भाजप नव्हे, तर ममता बॅनर्जी याच धार्मिक तणाव पसरवत आहेत. त्याच समाजात तेढ निर्माण करत आहेत. बंगाली हिंदू आता बेघर झाले आहेत आणि मदत छावण्यांमध्ये खिचडी खात आहेत. त्यांची चूक काय, असा सवालही चक्रवर्ती यांनी उपस्थित केला आहे.
ममता बॅनर्जी संविधानापेक्षा मोठ्या नाहीत
ममता बॅनर्जी यांनी नुकतेच मुर्शिदाबादमधील हिंसाचार पूर्वनियोजित असल्याचे म्हणत, यात बीएसएफ, केंद्रीय संस्था आणि भाजपचा हात आहे. त्यांनीच बांगलादेशातील लोकांची घुसखोरी होऊ दिली असल्याचा आरोप केला होता. यावर, मिथुन यांनी ममतांचे हे विधान दिशाभूल करणारे असून त्या मुस्लीम समाजाला जाणूनबुजून भरकटवत आहेत. तसेच, एक असा कायदा जो भारताच्या संसदेत पास झाला आहे. तो लागू न करण्याची शक्ती ममतांना कुणी दिली? त्या केवळ एक मुख्यमंत्री आहेत. त्या संविधानापेक्षा मोठ्या नाहीत. आता बंगालमधील हिंदू समाज संघटित होत आहे. आता ममता यांच्या पक्षाला पुन्हा सत्ता मिळणार नाही. त्यांचा खेळ हिंदूंच्या लक्षात आला आहे. ते पुढे म्हणाले की राज्यात निवडणुका राष्ट्रपती राजवटीखाली घेण्यात याव्यात. पश्चिम बंगालमध्ये हिंदू एकत्र येण्यास सुरुवात झाली आहे. आता ममता बॅनर्जी यांचा पराभव निशचित आहे असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.
मुर्शिदाबाद हिंसेमागे भाजप, केंद्रीय संस्था- ममता बॅनर्जी
मुर्शिदाबाद जिल्ह्यातील झालेली हिंसा पूर्वनियोजित असल्याचा आरोप पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केला आहे. सीमा सुरक्षा दल (बीएसएफ), गृह मंत्रालयाच्या अंतर्गत केंद्रीय संस्था आणि भाजपने बाह्य घटकांना मदत करून, घुसखोरांना चिथावणी देऊन हा तणाव उत्पन्न केला, असे त्या म्हणाल्या. मुस्लिम नेत्यांच्या परिषदेत त्या बोलत होत्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जुलमी असा वक्फ सुधारणा कायदा लागू न करण्याचे आवाहन करतानाच त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर लगाम ठेवावा, अशी विनंती मोदींना केली. शाह यांच्या स्वत:च्या राजकीय अजेंड्यामुळे देशाचे मोठे नुकसान होत असल्याचे बॅनर्जी म्हणाल्या.
मुर्शिदाबाद हिंसाचाराचा तपास एसआयटीकडे
मुर्शिदाबाद जिल्ह्यात ११ आणि १२ एप्रिल रोजी उसळलेल्या हिंसाचाराची चौकशी करण्यासाठी पश्चिम बंगाल सरकारने विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन केली आहे. या नऊ सदस्यीय एसआयटीचे नेतृत्व डीआयजी (मुर्शिदाबाद रेंज) करणार आहेत. पथकात गुप्तचर शाखेचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक, सीआयएफ आणि सीआयडीचे दोन उपाधीक्षक, चार निरीक्षक, ट्रॅफिक पोलीसचा एक निरीक्षक आणि सुंदरबन पोलीस जिल्ह्याच्या सायबर गुन्हे शाखेचे अधिकारी या पथकात समाविष्ट आहेत. दरम्यान बॅनर्जी यांनी हिंसेत मृत पावलेल्यांना दहा लाख रुपये देण्याची घोषणा केली आहे.
महिला आयोग करणार स्वतंत्र चौकशी
हिंसाचारामुळे मुर्शिदाबादमधून मोठ्या प्रमाणात लोक विस्थापित झाले आहेत. मंदिरपाडा परिसरात महिलांवर कथित अत्याचार झाला असून अनेक महिला आणि लहान मुलांनी भागीरथी नदी ओलांडून मालदा जिल्ह्यात आश्रय घेतला आहे. राष्ट्रीय महिला आयोगानेही या घटनेची गंभीर दखल घेतली असून चौकशी समिती स्थापन केली आहे. या समितीचे नेतृत्व आयोगाच्या अध्यक्ष विजया रहाटकर करणार आहेत. गुरुवारी (दि. १७) या समितीचे सदस्य कोलकात्यात पोहोचतील, मालदा आणि मुर्शिदाबाद दौरा करतील.समिती पीडित महिलांशी संवाद साधणार असून प्रशासनाशी चर्चा करणार आहे. भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी उपायदेखील ही समिती सुचवणार आहे.