'कहानी भारत की', हरीकृष्ण गोस्वामी उर्फ मनोजकुमार

हिंदी सिनेसृष्टीचे दिग्गज अभिनेते मनोजकुमार यांच्या निधनाने संपूर्ण फिल्म इंडस्ट्रीत शोककळा पसरली आहे. आपल्या चित्रपट कारकिर्दीत त्यांनी अनेक अविस्मरणीय चित्रपट दिले आणि हिंदी सिनेमाच्या वाढीमध्ये महत्त्वपूर्ण योगदान दिले.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Admin
  • Sat, 5 Apr 2025
  • 01:29 pm
pune mirror, civic mirror, marathi news, breaking news, pune news, pune times mirror

सग्रहीत छायाचित्र

हिंदी सिनेसृष्टीचे दिग्गज अभिनेते मनोजकुमार यांच्या निधनाने संपूर्ण फिल्म इंडस्ट्रीत शोककळा पसरली आहे. आपल्या चित्रपट कारकिर्दीत त्यांनी अनेक अविस्मरणीय चित्रपट दिले आणि हिंदी सिनेमाच्या वाढीमध्ये महत्त्वपूर्ण योगदान दिले. पण त्यांच्या करिअरच्या सुरुवातीचा प्रवास कसा होता? संघर्षाचे दिवस कसे होते? या त्यांच्या संघर्षमय आयुष्यातील काही अनमोल आठवणी आज पुन्हा एकदा आठवून आपण मनोजकुमार यांना श्रद्धांजली वाहू या!

मनोजकुमार हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये हिरो बनण्यासाठी आले होते. पण दिग्दर्शक लेखराज भाकडी आणि कुलदीप सहगल (ज्यांना ते भाऊसाहेब म्हणायचे) यांनी त्यांना 'फॅशन' (१९५७) या चित्रपटात ९० वर्षांच्या भिकाऱ्याची भूमिका दिली. त्या वेळी ते अवघे १९ वर्षांचे होते. अशाच एक प्रसंगी मनोजकुमार यांनी त्यांना विचारले, "माझ्यासाठी तुम्ही काय विचार केला आहे?" त्यावर उत्तर मिळाले, "अजून तुझा एक जोडा सुद्धा गुळगुळीत झाला नाही. येथे लोकांचे पूर्ण आयुष्य संघर्ष करण्यात जाते!" हे ऐकल्यानंतर मनोजकुमार यांनी ठरवले की हिंदी सिनेमात नाव कमवायचे आणि आयुष्यभर त्यांनी चित्रपट क्षेत्रात काम करायचे ठरविले.

संघर्ष करत असताना त्यांना एकदा अशोक कुमार (दादा मुनि) यांच्या चित्रपटाचा सीन लिहिण्याची संधी मिळाली. त्यासाठी त्यांना फक्त ११ रुपये मानधन मिळाले. ते सांगतात, "निर्माते रोशनलाल मल्होत्रा ‘जमीन और आसमान’ नावाचा चित्रपट करत होते. एक दिवस ते स्टुडिओत चिंतेत बसले होते. मी विचारले, 'काय झाले मल्होत्रा साहेब?' ते म्हणाले, 'चित्रपटातील अशोक कुमार यांचा एक सीन त्यांना पसंत पडत नाही.' मी म्हटले, 'मी नव्याने लिहू का?' मी तो सीन लिहिला आणि तो अशोक कुमार यांना खूप आवडला. निर्मात्यांनी मला त्यासाठी ११ रुपये दिले." यानंतर अनेक निर्माते त्यांच्याकडून सिनेमांचे सीन लिहून घेऊ लागले. पण लेखनाबरोबरच मनोजकुमार सतत नायक बनण्यासाठीही प्रयत्न करत राहिले. देशप्रेम हा मनोजकुमार यांच्या हृदयाच्या अगदी जवळचा विषय होता. त्यांच्या चित्रपटांतून ही भावना अनेकदा दिसून आली. त्यांच्या करिअरच्या सुरुवातीला त्यांनी ‘गंगू तेली’ नावाची डॉक्युमेंट्री फिल्म केली. ही फिल्म खादीचा प्रचार करण्यासाठी बनवण्यात आली होती. या चित्रपटासाठी त्यांना १००० रुपये मानधन मिळाले. वयाच्या २५व्या वर्षी त्यांनी शशी गोस्वामी यांच्यासोबत प्रेमविवाह केला. लग्नाआधी त्यांनी ‘हरियाली और रास्ता’ (१९६२) हा चित्रपट पूर्ण केला होता. या चित्रपटासाठी त्यांना ११ हजार रुपये साइनिंग अमाउंट मिळाले होते. हा चित्रपट त्यांच्या लग्नानंतर प्रदर्शित झाला आणि सुपरहिट ठरला. त्यामुळे त्यांच्या पत्नी म्हणायच्या, "माझ्या गुडलकमुळेच हा चित्रपट हिट झाला!" यावर मनोजकुमार हसून म्हणायचे, "हो, मी तर फक्त एक मजूर माणूस आहे!"

अनेकांचे आधारवड

मनोजकुमार यांनी जेव्हा पर्यंत त्यांना शुद्ध होती, तेव्हा पर्यंत ते दररोज वृत्तपत्र वाचत असत. त्यांनी अनेक वर्षांपूर्वी टेलिव्हिजन पाहणे पूर्णपणे सोडले होते. वृत्तपत्रातही ते प्रामुख्याने राजकीय बातम्या वाचत असत. ही घटना अवघ्या दोन वर्षांपूर्वीची आहे. संपूर्ण देशात शाहरुख खानच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या 'पठाण' चित्रपटाची चर्चा गाजत होती. चित्रपट प्रदर्शित होऊन अजून आठवडाही झाला नव्हता आणि त्याच दरम्यान, महाराष्ट्राचे तत्कालीन सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार त्यांना पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलसाठी आमंत्रण देण्यासाठी पोहोचले. त्यांच्यासोबत काही माध्यम प्रतिनिधीही होते आणि ह्याच वेळी मनोजकुमार यांचे कदाचित शेवटचे छायाचित्रही प्रसारमाध्यमांनी घेतले. या भेटीदरम्यान समकालीन चित्रपटांविषयी चर्चा झाली. जेव्हा विषय शाहरुख खानच्या 'पठाण' चित्रपटावर आला, तेव्हा ते ताबडतोब म्हणाले, "अजय देवगणचा 'दृश्यम २' पण हिट झालाय, ते विसरू नका!"

खूप कमी लोकांना माहिती आहे की अजय देवगण यांचे वडील, वीरू देवगण यांना स्टंट दिग्दर्शक बनवण्यामध्ये मनोजकुमार यांचा मोठा हातभार होता. 'रोटी, कपडा और मकान' या चित्रपटात त्यांनी वीरू देवगण यांना स्टंट दिग्दर्शक म्हणून संधी दिली होती. या चित्रपटातील अमिताभ बच्चन यांचा एक हात सोडून मोटारसायकल चालवण्याचा स्टंटदेखील वीरू देवगण यांनी केला होता.

भारत सरकारचा सर्वोच्च चित्रपट सन्मान ‘दादासाहेब फाळके पुरस्कार’ मिळालेले मनोजकुमार अखेपर्यंत शाहरुख खानला माफ करू शकले नाहीत. त्यांच्या बोलण्यातून हे जाणवत होते की ‘ओम शांती ओम’ चित्रपटात त्यांची खिल्ली उडवण्यात आल्याची गोष्ट त्यांनी अजूनही विसरलेली नव्हती. वयाच्या ८५व्या वर्षीही त्यांची स्मरणशक्ती उत्तम होती.जेव्हा शाहरुख खानच्या 'पठाण'च्या विक्रमी यशाचा उल्लेख झाला, तेव्हा त्यांनी पुन्हा अजय देवगणचा उल्लेख केला. त्यांना विचारण्यात आले की त्यांनी शेवटचा कोणता चित्रपट थिएटरमध्ये पाहिला, तेव्हा ते म्हणाले, "मी शेवटचा 'थ्री इडियट्स' हा आमिर खानचा चित्रपट थिएटरमध्ये पाहिला होता."

आजच्या चित्रपटांबद्दल मनोजकुमार म्हणाले, "आजकालच्या चित्रपटांचं तसंच झालंय, जसे गुलाब जामुनमध्ये जामुन हे नाव असते, पण त्याला खरी जामुनची चव नसते." २१व्या पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये त्यांना सिनेसृष्टीतील त्यांच्या अमूल्य योगदानासाठी सन्मानित करण्यात येणार होते. मात्र, प्रकृती अस्वास्थ्यामुळे ते कार्यक्रमाला उपस्थित राहू शकले नाहीत. त्यामुळे ३१ जानेवारी रोजी तत्कालीन सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी त्यांच्या घरी जाऊन त्यांना सन्मानित केले. 

'भारत का रहने वाला हूं...भारत की बात सुनाता हूं...' या गाण्याने देशभरात आणि जगभर प्रसिद्धी मिळवणारे अभिनेता मनोजकुमार आता या जगात नाहीत. त्यांचे शुक्रवारी (दि.०४) वयाच्या ८७ व्या वर्षी कोकिलाबेन रुग्णालयामध्ये पहाटे ३:३० वाजता निधन झाले. मनोजकुमार यांनी 'संतोष', 'रोटी कपडा और मकान', 'बे-इमान', 'कलयुग और रामायण', 'अनिता', 'आदमी' यांसारख्या अनेक गाजलेल्या सिनेमांमध्ये भूमिका साकारत प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले आहे. त्यांच्या पश्चात पत्नी शशी गोस्वामी आणि मुलगा कुणाल गोस्वामी आहेत.

मनोजकुमार यांच्या मृत्यूचे कारण उघड करताना त्यांचा मुलगा अभिनेता-उद्योजक कुणाल गोस्वामीने काही गोष्टी उघड केल्या आहेत. वडील मनोजकुमार यांच्या निधनाबद्दल एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना ते म्हणाले, 'नमस्कार, मी कुणाल गोस्वामी. दुर्दैवाने, माझे वडील मनोजकुमार जी यांचे आज पहाटे ३:३० वाजता कोकिलाबेन अंबानी रुग्णालयात निधन झाले. ते बराच काळ आजारी होते पण त्यांनी मोठ्या धैर्याने सर्व गोष्टींचा सामना केला आणि ही देवाची कृपा आहे, शिर्डीच्या साई बाबांची कृपा आहे की ते या जगातून शांतपणे निघून गेले. उद्या सकाळी त्यांचे अंत्यसंस्कार होतील. साई राम.'

कुणाल गोस्वामी यांनी अनेक चित्रपटांमध्ये काम केले. त्याच्या वडिलांनी त्याला हिरो बनवण्यासाठी खूप कष्ट केले. पण करिअरला चालना मिळू शकली नाही. सध्या कुणाल केटरिंगचा व्यवसायामध्ये आहेत. कुणाल गोस्वामीने सांगितलं की, त्याचे वडील मनोजकुमार अनेक वर्षांपासून आजाराने ग्रस्त होते. 'दोन महिन्यांत ते ८८ वर्षांचा होणार होते. आणि आता त्यांचं वयाच्या ८७ व्या वर्षी निधन झाले. ते सर्वांशी बोलत असत. विशेषतः त्यांच्या नातवंडांसोबत आणि त्यांच्या धाकट्या नातूवासोबत... ते सर्वांसोबत संवाद ठेवत वागायचे आणि ते खूप आनंदी होते. वयानुसार आजारी असल्यामुळे ते वेदना सहन करत होते', असे कुणाल यांनी सांगितले.

Share this story