मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाच्या दसरा मेळाव्यात करण्यात आलेल्या भाषणाने आणि त्यानंतर झालेल्या वक्तव्यांनी महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ माजवली आहे. माजी मंत्री रामदास कदम यांनी याच मेळाव्यात केलेल्या धक्कादायक आरोपावर आता शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) नेते खासदार संजय राऊत यांनी कठोर शब्दांत प्रत्युत्तर दिले आहे.
रामदास कदम यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर त्यांचा मृतदेह तसाच ठेवला होता तसेच त्यांच्या हाताचे ठसे घेण्यात आले होते, असा खळबळजनक आरोप केला होता. या आरोपावर प्रतिक्रिया देताना संजय राऊत म्हणाले, “आता यांच्या तोंडात कुणीतरी भीतीपोटी शेण कोंबलं असेल आणि ते बोलत असतील तर काय करणार?”
राऊत पुढे म्हणाले, “शिवसेनाप्रमुखांना जाऊन दहा वर्षे झाली आहेत. आता त्यांच्या शताब्दीदेखील जवळ आली आहे. ज्या बाळासाहेबांनी आम्हाला, तुम्हाला मोठं केलं, त्यांच्याशी अशा प्रकारे बेईमानी करणं योग्य नाही.” शिंदे गटाच्या मेळाव्यातील या आरोपामुळे दोन्ही गटांमधील जुनी वैर पुन्हा चिघळल्याचे चित्र आहे. या प्रकरणावरून राजकीय वादळ उठण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.


