Budget 2025 : अर्थसंकल्पातून महाराष्ट्रातील रेल्वेसाठी काय मिळालं? राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी दिली सविस्तर माहिती...

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी शनिवारी (दि.१) सलग आठव्यांदा केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला. त्यानंतर केंद्रीय अर्थसंकल्पात महाराष्ट्रातील रेल्वेसाठी काय मिळाले याची चर्चा सुरु आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Swapnil Hajare
  • Tue, 4 Feb 2025
  • 07:10 am
Civic Mirror, सीविक मिरर, Pune Mirror, Pune Times Mirror, Pune, Pune News

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस...

मुंबई :-  अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी शनिवारी (दि.१) सलग आठव्यांदा केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला. त्यानंतर केंद्रीय अर्थसंकल्पात महाराष्ट्रातील रेल्वेसाठी काय मिळाले याची चर्चा सुरु आहे. याबाबत केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सोमवारी महत्वाची माहिती दिली आहे. महाराष्ट्रातील रेल्वेच्या वेगवेगळ्या प्रकल्पांसाठी 23 हजार 778 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असल्याची त्यांनी सांगितले. त्यानंतर याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांचे आभार मानले आहेत.

मुख्यमंत्र्यांनी ही तरदूत २० पटीने अधिक असल्याचे सांगितले आहे. मुख्यमंत्री म्हणतात की, "यापूर्वी २००९-१४ या काळात महाराष्ट्राला वर्षाला सरासरी १ हजार १८१ कोटी रुपये मिळायचे. यंदा एकाच वर्षातील तरतूद ही तब्बल २० पटींनी अधिक आहे. २०१४ ते २०२५ या दरम्यान राज्यात दरवर्षी सरासरी १९१ किलोमीटर्सचे नवे रेल्वे मार्ग विकसित केले गेले आहेत. हे प्रमाण यापूर्वीच केवळ दरवर्षी सरासरी ५८ किलोमीटर इतके होते. २००९-१४ या कालावधीत एकाही मार्गाचे विद्युतीकरण झाले नव्हते. त्यानंतर २०१४ ते २०२५ या काळात दरवर्षी सरासरी ३२६ किलोमीटर्स मार्गांचे विद्युतीकरण करण्यात आले यामुळे महाराष्ट्रातील ३ हजार ५८६ म्हणजेच पूर्णपणे विद्युतीकरण झाले आहे.याच कालावधीत महाराष्ट्रात २ हजार १०५ किलो मीटर्सचे नवे रेल्वे मार्ग बांधण्यात आले. तुलनाच करायची झाल्यास ही लांबी मलेशियातील आता अस्तित्वात असलेल्या संपूर्ण रेल्वे मार्गाच्या लांबी इतकी होते."

पुढे ते म्हणतात की, "महाराष्ट्रात सध्या १ लाख ५८ हजार ८६६ कोटी रूपयांचे ४७ प्रकल्प प्रगतीपथावर आहेत. यातून ६ हजार ९८५ किलोमीटर मार्गाची बांधणी सुरू आहे. यामध्ये बुलेट ट्रेनसह केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजूर केलेल्या  ‘डेडीकेटेड फ्रेट कॉरिडॉर- डिएफसी’ चार महत्वाकांक्षी प्रकल्पांचा समावेश आहे. राज्यात ५ हजार ५८७ कोटी रुपयांच्या तरतुदीतून १३२ अमृत रेल्वेस्थानकांची निर्मिती केली जात आहे.

रेल्वेची कवच सुरक्षा प्रणाली ४ हजार ३३९ मार्ग अंतरासाठी कार्यान्वीत केली जाणार आहे. यातील सध्या ५७६ किमीसाठीची यंत्रणा कार्यान्वीत आहे. राज्यभरात २०१४ पासून आतापर्यंत विविध ठिकाणी १ हजार ६२ रेल्वे उड्डाण मार्ग, भुयारी मार्ग (आरएफओबी, आरयुबी) बांधण्यात आली आहेत. याशिवाय २३६ ठिकाणी लिफ्ट, ३०२ एस्कलेटर्स बसविण्यात आले आहेत. तसेच ५६६ रेल्वे स्थानकांवर वायफाय सुविधा उपलब्ध दिली आहे. याशिवाय राज्यातील ११ जिल्ह्यांसाठी उपयुक्त ठरतील अशा ११ वंदे भारत रेल्वेगाड्या सुरू करण्यात आल्या आहेत, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.

महाराष्ट्राच्या आतापर्यंतच्या वाटचालीत रेल्वेच्या पायाभूत सुविधांमध्ये अभूतपूर्व अशी वाढ झाली आहे. यामुळे प्रवाशांकरिता सोयी-सुविधा उपलब्ध झाल्या आहेत. माल वाहतूक सुविधा सहज सुलभ आणि मोठ्या प्रमाणात सुरू झाली आहे. या सगळ्यातून महाराष्ट्र हे रेल्वेच्या नकाशावरील सशक्त आणि सदृढ राज्य बनले आहे, असं देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. 

Share this story

Latest