बारामती : अजितदादांच्या प्रत्येक कामात आणि बारामतीच्या प्रत्येक वास्तूत त्यांचा स्पर्श आहे. दादांनी शेवटचा श्वासही याच मातीत घेतला. आज ते आपल्यात नाहीत यावर माझा आजही विश्वास बसत नाही,” अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. बारामती विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी आयोजित मेळाव्यात बोलताना सुनेत्रा पवार अत्यंत भावूक झाल्या होत्या.
मेळाव्यात कार्यकर्त्यांशी संवाद साधताना सुनेत्रा पवार यांचा कंठ दाटून आला होता. त्या म्हणाल्या, “अजितदादांसाठी बारामती ही त्यांच्या आईसारखी होती. त्यांनी विकासाचे आणि मताधिक्याचे सर्व विक्रम मोडीत काढले. मला कधी स्वप्नातही वाटले नव्हते की बारामतीत अशी पोटनिवडणूक होईल. पण आज ही निवडणूक केवळ माझी नसून संपूर्ण बारामतीकरांची आहे. दादांवर तुमचे किती प्रेम आहे, हे दाखवून देण्याची आणि त्यांना खऱ्या अर्थाने श्रद्धांजली वाहण्याची हीच वेळ आहे.”
“तुम्ही आजवर अजितदादांना साथ दिली, त्यापेक्षा थोडी जास्त साथ मला द्या. मी तुम्हाला कधीही वाऱ्यावर सोडणार नाही,” असे आवाहन करत त्यांनी बारामतीकरांना साद घातली. या भावनिक भाषणामुळे मेळाव्यात उपस्थित अनेक कार्यकर्त्यांचे डोळेही पाणावले होते.
सुनेत्रा पवार यांचा उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी महायुतीने मोठे शक्तिप्रदर्शन केले. या मेळाव्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, मंत्री धनंजय मुंडे, दिलीप वळसे पाटील, आदिती तटकरे, नरहरी झिरवळ यांच्यासह पार्थ पवार आणि जय पवार उपस्थित होते. महायुतीचा भक्कम पाठिंबा आपल्या पाठीशी असून, साहेबांची (शरद पवार) सून आणि दादांची पत्नी म्हणून बारामतीची धुरा सांभाळण्याची ताकद मला मिळेल, असा विश्वास सुनेत्रा पवार यांनी व्यक्त केला.
विकासाचा वारसा आणि प्रशासकीय दरारा कायम राहणार
बारामतीकरांना आश्वासित करताना सुनेत्रा पवार यांनी स्पष्ट केले की, अजितदादांनी सुरू केलेला विकासाचा वेग मंदावू दिला जाणार नाही. “बारामतीची ओळख आणि प्रतिष्ठा जराही कमी होऊ देणार नाही. नवीन प्रकल्प आणि गुंतवणुकीसाठी मी स्वतः प्रयत्न करेन. दादांचा जसा प्रशासनावर दरारा होता, तसाच तो यापुढेही राहील. शहरात गुंडगिरी आणि खंडणीला अजिबात थारा दिला जाणार नाही,” अशी ग्वाही त्यांनी दिली. तसेच अजितदादांचा प्रसिद्ध ‘जनता दरबार’ यापुढेही सुरू राहील, असेही त्यांनी नमूद केले.
पार्थ पवारांची काँग्रेसवर टीका
बारामती पोटनिवडणुकीसाठी सुनेत्रा पवार यांच्याविरोधात काँग्रेसकडून आकाश मोरे यांनी, तर करूणा मुंडे यांनी अपक्ष अर्ज भरला आहे. त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध होणार नाही, हे आता निश्चित झाले आहे. यावर खासदार पार्थ पवार यांनी यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. ”काँग्रेसच्या कोणत्याही नेतृत्वाशी अद्याप बोलणे झालेले नाही आणि यापुढे बोलणारही नाही. त्यांना काय करायचे ते कळले पाहिजे. सर्वांना माहीत आहे ते काय करत आहेत, ते सर्व मोठे लोक आहेत. सर्वांना कळत की काय चाललंय. म्हणून त्यांनी जो विचार केला असेल ते त्यांना कळुद्यात, असे पार्थ यांनी म्हटले. तसेच काँग्रेसला नंतर महाराष्ट्रात काय त्रास होणार हे त्यांना दिसेल, असा इशाराही पार्थ पवारांनी दिला आहे.
राज्याची संकृती काँग्रेस विसरणार नाही: बावनकुळे
चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, ”राज्याची संस्कृती काँग्रेस विसणार नाही, असे वाटते. काँग्रेसने निवडणूक लढली, तर आतापर्यंत जेवढो अध:पतन झाले आहे, त्यापेक्षा मोठा पराभव बारामतीत होईल. त्यामुळे काँग्रेसने संस्कार जपले पाहिजेत. अजितदादांनी आपले ८० टक्के आयुष्य हे काँग्रेस नेत्यांच्या सहवासात घालवले. काँग्रेसच्या सत्तेत महत्त्वाचे नेते म्हणून अजितदादांनी काम केले आहे. काँग्रेसने इतक्या लवकर अजितदादांना विसरू नये, असे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिवंगत अजित पवार यांच्या आठवणींना उजाळा दिला आहे. ‘ही निवडणूक बिनविरोध व्हावी, अशी आमची इच्छा होती. एखाद्या लोकप्रतिनीधींच्या निधनानंतर निवडणूक बिनविरोध व्हावी, ही परंपरा आहे. ती सगळ्यांनी पाळली पाहिजे, ही आपली भावना आहे,’ असे मत एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले. ते पुढे म्हणाले, ”ही पोटनिवडणूक आपल्याला दुर्दैवाने लढावी लागत आहे. अजितदादांच्या निधनाननंतर संपूर्ण राज्य शोकसागरात बुडाल्याचे आपण पाहिले. अजितदादांनी अनेक खात्याची जबाबदारी सांभाळली. अर्थखातेही उत्तमप्रकारे सांभाळले. लोकाभिमुख नेतृत्त्व, उत्तर प्रशासक उत्तम संघटक म्हणून अजितदादांनी काम केले,” असेही त्यांनी म्हटले.


