तुळजापूर: “राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबतचा जो प्राथमिक अहवाल समोर आला आहे, त्यावर आम्ही अजिबात समाधानी नाही. हा विषय केवळ तांत्रिक बिघाडाचा नसून, यामागे काही गंभीर कारणे आहेत का, याचा सखोल तपास झालाच पाहिजे,” अशी आक्रमक भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी मांडली. तुळजाभवानीच्या दर्शनासाठी आले असता त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.
काही दिवसांपूर्वी अजित पवार यांच्या विमानाला झालेल्या अपघाताने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली होती. या घटनेनंतर प्रशासनाने प्राथमिक अहवाल सादर केला, मात्र तटकरे यांनी या अहवालावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. “एका मोठ्या नेत्याच्या सुरक्षेचा हा प्रश्न आहे. प्राथमिक अहवालातील माहिती अपूर्ण वाटते. या प्रकरणाचा सखोल तपास होऊन सत्य जनतेसमोर आले पाहिजे, ही आमची ठाम मागणी आहे,” असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
तटकरे यांच्या या विधानामुळे आता या अपघाताकडे केवळ एक ‘अपघात’ म्हणून न पाहता, त्यामागे काही राजकीय किनार तर नाही ना, अशा चर्चांना उधाण आले आहे. सरकार आणि तपास यंत्रणा यावर आता काय पाऊल उचलतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


