मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी राज्यभरातून मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली आंदोलनासाठी मुंबई दाखल झाले आहेत. मात्र, गेल्या दोन दिवसांपासून काही मराठा आंदोलक भर रस्त्यात हुल्लडबाजी करताना दिसत आहेत. दरम्यान, एका अभिनेत्रीने मराठा आंदोलकांचा भयावह अनुभव आल्याचे म्हटले आहे.
हिंदी अभिनेत्री सुमोना चक्रवर्तीने मुंबईमध्ये तिच्यासोबत काही आंदोलकांनी गैरवर्तन केल्याचा गंभीर आरोप केला आहे. याबाबत तिने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत अनुभव सांगितला आहे. मात्र, काही वेळातच तिने ही पोस्ट डिलीट केली आहे.
अभिनेत्रीने नेमकं पोस्टमध्ये काय म्हटल आहे?
आज दुपारी १२:३० वाजता. मी कुलाबा ते फोर्टला गाडी चालवत होते. आणि अचानक-माझी गाडी एका जमावाने अडवली. एक भगव्या रंगाचा उपरणं (stole) घातलेला माणूस माझ्या बोनेटवर हात आपटत होता, हसत होता. माझ्यासमोर तो विचित्रपणे नाचत होता, जणू काहीतरी सिद्ध करत होता. त्याचे मित्र माझ्या गाडीच्या काचांवर हात आपटत होते, “जय महाराष्ट्र!” ओरडत होते आणि हसत होते.
आम्ही थोडं पुढे गेलो आणि पुन्हा तेच घडलं. ५ मिनिटांत दोन वेळा. पोलीस नव्हते. (जे नंतर दिसले ते फक्त बसून गप्पा मारत होते, निवांत होते)
कोणताही कायदा आणि सुव्यवस्था नव्हती. माझ्या गाडीत, दिवसाढवळ्या, दक्षिण मुंबईत- मला असुरक्षित वाटत होतं. रस्त्यांवर केळीच्या साली, प्लास्टिकच्या बाटल्या, घाण यांचा ढिग साचलेला होता. फूटपाथवर कब्जा केला होता.
आंदोलक खात होते, झोपत होते, आंघोळ करत होते, स्वयंपाक करत होते, लघुशंका करत होते, शौचास जात होते, व्हिडीओ कॉल करत होते, रील्स बनवत होते, आंदोलनाच्या नावाखाली मुंबई दर्शन करत होते. नागरी जबाबदारीची (civic sense) पूर्ण चेष्टा होती. मी जवळजवळ माझे पूर्ण आयुष्य मुंबईत राहिले आहे. मला इथे नेहमीच सुरक्षित वाटले आहे- विशेषतः दक्षिण मुंबईत. पण आज, अनेक वर्षांत पहिल्यांदा, दिवसाढवळ्या माझ्या स्वतःच्या गाडीच्या सुरक्षिततेतही मला खऱ्या अर्थाने असुरक्षित वाटलं.
मला स्वतःला नशीबवान वाटलं – कारण एक पुरुष मित्र माझ्यासोबत होता. माझ्या मनात विचार आला, जर मी एकटी असती तर काय झालं असतं??? माझ्या मनात व्हिडिओ रेकॉर्ड करण्याचा मोह झाला, पण लवकरच मला कळलं की यामुळे ते आणखी चिथावले जाऊ शकतात. म्हणून मी तसे केले नाही. जेव्हा तुम्हाला कळते की तुम्ही कोणीही असा, किंवा कुठेही असा, कायदा आणि सुव्यवस्था काही सेकंदांत कोलमडू शकते, तेव्हा भीती वाटते.
शांततापूर्ण आंदोलने अस्तित्वात असतात – आपण ती अधिक तातडीच्या कारणांसाठीही पाहिली आहेत. तरीही, पोलीस अशाच आंदोलकांवर कठोर कारवाई करतात. पण इथे? पूर्णपणे अराजकता. एक कर भरणारी नागरिक म्हणून, एक महिला म्हणून आणि या शहरावर प्रेम करणाऱ्या व्यक्ती म्हणून, मी व्यथित झाले आहे. या प्रशासनाच्या आणि नागरिक जबाबदारीच्या चेष्टेपेक्षा आम्हाला अधिक चांगल्याची अपेक्षा आहे. आपल्या स्वतःच्या शहरात सुरक्षित वाटण्याचा अधिकार आपल्याला आहे, असं अभिनेत्रीने आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.
मात्र, तिने काही तासांतच ही पोस्ट डिलीट केली आहे.


