संपादकीय : भारताची मुत्सद्देगिरी अधोरेखित करणारे राणाचे प्रत्यार्पण...
२६/११ च्या मुंबईवरील भीषण दहशतवादी २ हल्ल्याला १५ वर्षे पूर्ण झाली आहेत. त्याचे दुष्परिणाम भारतीयांच्या मनावर अजूनही आघात करीत आहेत. या हल्ल्याशी संबधित अनेक आरोपी भारतीय यंत्रणांना सापडलेले नाहीत. त्यातील एक प्रमुख संशयित तहव्वूर राणा याचे अमेरिकेने भारताकडे प्रत्यार्पण केले आहे. हे एक महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे.
राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे (एनआयए) त्याचा ताब्यात देण्यात आला आहे. पतियाळा येथील विशेष न्यायालयाने त्याला १८ दिवसांची कोठडी सुनावली आहे. तहव्वूर राणा हा मूळचा पाकिस्तानी असून, नंतर तो कॅनडाचा नागरिक बनला. अमेरिकेत तो व्यवसाय करत होता आणि त्याचे डेव्हिड कोलमन हेडलीशी घनिष्ठ संबंध होते. हेडलीनेच २६/११ च्या हल्ल्याआधी मुंबईत रेकी केली होती. त्यासाठी त्याने राणाच्या हॉस्पिटल व्यवसायाचा वापर केला होता. त्या कागदपत्रांच्या आधारेच तो भारतात फिरला.
हेडलीला २००९ मध्ये अमेरिकेने अटक केली. त्यानंतर राणालाही अटक करण्यात आली. हेडलीने आपले अपराध मान्य केले. त्याला शिक्षादेखील झाली. राणा तब्बल १४ वर्षांपासून अमेरिकेच्या तुरुंगात होता. त्याला अमेरिकेतही दोषी ठरवण्यात आले होते. आपले प्रत्यार्पण भारताकडे न होऊ नये, यासाठी राणा प्रयत्न करत होता. परंतु, २०२० मध्ये भारताच्या मागणीनंतर अमेरिकेतील न्यायालयाने त्याचे प्रत्यार्पण मंजूर केले. अमेरिका आणि भारत यांच्यात असलेल्या प्रत्यार्पण कराराअंतर्गत हे शक्य झाले.
हेडलीने तपास अधिकाऱ्यांना दिलेल्या कबुलीजबाबात राणाचे नाव अनेक वेळा घेतले होते. राणाच्याच मदतीने हेडलीने मुंबईत प्रवेश मिळवला होता. राणाचे पाकिस्तानातील दहशतवादी संघटनांशी, विशेषतः लष्कर-ए- तैयबाशी तसेच पाकिस्तानी गुप्तहेर संघटना 'आयएसआय'शी संबंध होते. त्याने आणि हेडलीने एकत्रितपणे हल्ल्याची तयारी केली होती. राणाच्या प्रत्यार्पणामुळे या नेटवर्कमधील अनेक गूढ बाबी उघडकीस येण्याची शक्यता आहे. भारतामधील न्यायालयीन प्रक्रियेनंतर या हल्ल्यामागील षडयंत्राबाबत महत्वाची माहिती समोर येणार आहे. या कटात सहभागी असलेल्या भारतातील काही व्यक्ती आणि राष्ट्रविघातक घटकांचा बुरखा फाटणार आहे.
या हल्याप्रकरणी अजमल कसाबला फाशी देण्यात आली असली तरी राणा आणि इतर सूत्रधाराविरोधात कारवाई होणे हे न्याय प्रक्रियेसाठी अत्यंत गरजेचे आहे. त्यामुळेच तहव्दूर राणाचे प्रत्यार्पण हे भारताच्या दृष्टीने केवळ न्याय नव्हे तर राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीनेही अत्यंत महत्त्वाचे पाऊल ठरत आहे. मुंबईवरील २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यानंतर सुमारे १६ वर्षांनी अखेर या कटात सहभागी असलेला एक महत्त्वाचा आरोपी भारताच्या ताब्यात आला आहे. त्याच्यावर भारतात हल्ल्याच्या षड्यंत्रात सहभागी होणे, आर्थिक मदत करणे, बनावट ओळखपत्रांचा वापर करणे यासारखे गंभीर आरोप आहेत.
राणावर आरोप सिद्ध झाल्यास २६/११ च्या कटातील आणखी महत्त्वाचे पुरावे भारताच्या हाती लागण्याची शक्यता आहे. त्याच्या माध्यमातून आणखी कोणत्या दहशतवादी यंत्रणांचे जाळे विणण्यात आले आहे, याबाबत माहितीदेखील मिळण्याची शक्यता आहे. मुंबईवरील हल्ल्याला देशाच्या सार्वभौमत्वावरील हल्ला असे संबोधण्यात येते. प्रत्येक भारतीयाच्या मनात ही सल आणि भळभळती जखम अद्याप कायम आहे. या प्रत्यार्पणामुळे भारताची आंतरराष्ट्रीय पातळीवरील मुत्सद्देगिरी अधोरेखित झाली आहे.