खाणीत सोने सापडले, सराफाकडे विक्री करता येत नाही. त्यामुळे कमी पैशात दागिने विकत असल्याची बतावणी करून एका महिलेची पंधरा लाखांनी फसवणूक करण्यात आल्याची घटना नागपूरमध्ये घडली. याप्रकरणी आरोपी दाम्पत्याला पुण्यातून अटक करण्यात आली आहे.
आरोपींनी सोन्याचे दागिने असल्याचे भासवत प्रत्यक्षात पितळेचे दागिने दिले. महिलेला दागिने खोटे असल्याचे कळाल्यानंतर नंदनवन पोलिस स्टेशनमध्ये महिलेने तक्रार नोंदवली. याप्रकरणी पोलिसांनी तपास केला असता आरोपी दाम्पत्याला पुणे येथून अटक करण्यात आली. गणेश काशी आणि त्याची पत्नी शांती काशी अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. त्यांच्या ताब्यातून ७ लाखांची रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे.
नेमकं घडलं तरी काय?
फिर्यादी सरला अग्रवाल यांचे इतवारी परिसरात रजाई भंडार या नावाने दुकान आहे. या दुकानात आरोपी दाम्पत्य त्यांच्याकडून बेडशीट खरेदी करायला आले होते. घरी गेल्यानंतर बेटशीट परत करण्याच्या बहाण्याने पुन्हा दुकानात गेले. त्यांच्याशी ओळख करून घेतली. खाणीत सोने सापडले, सराफाकडे विक्री करायला गेलो तर पावती मागतील आणि पावती आमच्याकडे नाही. काही दिवसांत मुलीचे लग्न आहे. आम्हाला पैशांची नितांत गरज आहे. त्यामुळे कमी पैशांत दागिने विकत आहे, असे सांगत सरला अग्रवाल यांना विश्वासात घेतलं.
आधी विश्वास बसावा म्हणून आरोपीने फिर्यादी यांना चार सोन्याचे मनी दिले. त्यांनी सराफा व्यापाऱ्याकडून तपासणी केली असता ते सोन्याचे असल्याचे सांगण्यात आले. यामुळे फिर्यादी सरला अग्रवाल यांचा आरोपींवर विश्वास बसला. नंतर त्यांनी १५ लाखांत सौदा पक्का केला. दागिने घेतल्यानंतर अग्रवाल सराफा दुकानात तपासणी करायला गेल्या असता ते दागिने पितळेचे असल्याचे उघड झाले. त्यांनी लगेच नंदनवन पोलिस ठाणे गाठून तक्रार दिली आणि पोलिसांनी तांत्रिक तपासाच्या आधारे आरोपी दाम्पत्याला अटक केली आहे.