पुणे : Pune News शिवाजीनगर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या हवालदार सागर जाधव यांच्यावर लाच व खंडणीचे गंभीर आरोप करण्यात आले असून, या प्रकरणाची तक्रार थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडे यामध्ये पोलीस आयुक्त अमितेश कुमार आणि पोलिस उपायुक्त कृषिकेश रावले यांच्याकडे करण्यात आली आहे. या आरोपांमुळे पुणे पोलीस दलात खळबळ उडाली आहे.
तक्रारदार विजय मल्लिकार्जुन कोळी यांनी दिलेल्या अर्जानुसार, जुगार प्रतिबंधक कायद्यांतर्गत दाखल गुन्ह्यात मदत करण्याच्या बहाण्याने जाधव यांनी पैशांची मागणी केली. ‘गेट जामीन’ मिळवून देण्याचे आमिष दाखवत कोळी यांचा मित्र रमेश धनगर याच्याकडून २ लाख २५ हजार रुपये घेतल्याचा आरोप आहे. हे व्यवहार शिवाजीनगर पोलीस ठाण्यासमोरील एका पानटपरीवर झाल्याचेही नमूद करण्यात आले आहे.
तसेच, कोळी याचा साथीदार विशाल काळे याला अटक करण्याची धमकी देत त्याच्याकडून २ लाख ५० हजार रुपये उकळण्यात आल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. अशा प्रकारे जवळपास पाच लाख रुपयांची वसुली झाल्याचे म्हटले आहे.
तक्रारीनुसार, जाधव यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना केवळ एक लाख रुपये घेतल्याचे सांगितले असून, त्यातील काही हिस्सा वरिष्ठांना दिल्याचाही दावा करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर संबंधितांवर लाच व खंडणीचे गुन्हे दाखल करून कठोर कारवाई करावी, तसेच दोषी आढळल्यास सेवेतून बडतर्फ करावे, अशी मागणी तक्रारदाराने केली आहे.
दरम्यान, जाधव यांना ‘वसुली भाई’ म्हणून ओळखले जात असल्याचा उल्लेख तक्रारीत असून, यापूर्वी खडकी पोलीस ठाण्यात कार्यरत असतानाही अशाच प्रकारच्या चर्चेत त्यांचे नाव आले होते, असे सांगण्यात आले आहे. पोलीस आयुक्तांनी यापूर्वी अशा प्रकारांवर कडक कारवाईचे आदेश दिले असतानाही हे प्रकार सुरू असल्याचा आरोप आहे.
या प्रकरणात सखोल चौकशी करून वस्तुस्थिती स्पष्ट केली जाईल का आणि दोषींवर कारवाई होईल का, याकडे लक्ष लागले आहे.


