बनावट विवाह करून फसवणाऱ्या टोळीचा पर्दाफाश, सहा जणांना अटक
तरुणांशी विवाह करून त्यांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या टोळीचा पोलीसांनी पर्दाफाश केला आहे. या प्रकरणी पोलीसांनी दोन महिला आणि चार पुरूष अशा एकूण सहा जणांना अटक केली आहे. ही कारवाई पुणे ग्रामीण विभागाच्या नारायणगाव पोलीसांनी केली आहे.
जयश्री काळू घोटाळे (वय ३५, रा. मुरंबी शिरजगाव, ता.त्रंबकेश्वर, नाशिक), मीरा बंसी विसलकर (वय ३९, रा. अंबुजा वाडी इगतपुरी, घोटी नाशिक), तुकाराम भाऊराव मांगते (वय २३, रा.अंबुजा वाडी इगतपुरी, घोटी नाशिक), बाळू भिकाजी काळे (वय ४६, रा. बोटा, ता. संगमनेर, जि. अहमदनगर), शिवाजी शंकर कुरकुटे (वय ६४, रा. कुरकुटेवाडी बोठा संगमनेर, जि. अहमदनगर) आणि बाळू गुलाब सर्वडे (वय ४१, रा. गुंजाळवाडी, ता. जुन्नर, जि. पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, विवाहास इच्छुक असणाऱ्या दोन तरुणांशी एकाच महिलेने लग्न केले होते. तसेच त्यांची आर्थिक फसवणूक करून नवरी पळून गेल्याबाबतच्या तक्रारी नारायणगाव पोलीस ठाण्यात आल्या होता. त्यानुसार पोलीसांनी तपास करत बनावट लग्न लावून फसवणूक करणाऱ्या टोळीला ताब्यात घेतले.
बनावट लग्न लावून फसवणूक करणाऱ्या टोळी ताब्यात घेतल्यानंतर त्यांची कसून चौकशी करण्यात आली. यावेळी विवाहास इच्छुक असणाऱ्या तरुणांशी बनावट लग्न करायचे. त्यानंतर आर्थिक फसवणूक करून पळ काढत असल्याचे निष्पन्न झाले. या टोळीने अशा अनेक तरुणांची फसवणूक केल्याचे समोर आले आहे. त्यानुसार पोलीसांना सहा जणांना अटक केली असून त्यांच्याविरोधात कलम ४२०, ४०६ आणि ३४ याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास नारायणगाव पोलीस करत आहेत.