संग्रहित छायाचित्र
ही दोस्ती तुटायची नाय असे म्हणत मित्रांसाठी प्रसंगी जीवही देणारे जिवाभावाचे मित्र असतात. कधीकधी तर रक्ताच्या नात्यापेक्षा मैत्रीचे नाते अधिक प्रभावी असल्याचे अनेकदा दिसून येते. याच निखळ मैत्रीमधून मित्र एकमेकांसाठी वाट्टेल ते करण्यास तयार असतात. कधी मारामारी करतात... कधी एकमेकांना मदत करतात... कधी एकमेकांच्या सुख-दु:खात सहभागी होतात... तर, कधी मित्राचा प्रेम विवाह करून देण्यात पुढाकार घेतात. मग, त्यासाठी कोणताही त्रास सहन करावा लागला तरी त्यांची तयारी असते. अशीच एक मैत्रीची व्याख्या अधिक घट्ट करणारी घटना समोर आली आहे. मित्राला पळून जाऊन प्रेम विवाह करण्यास मदत केल्याच्या कारणावरून मुलीकडील नातेवाईकांनी दोन तरुणांचे अपहरण करून त्यांना बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे.
हा प्रकार २६ सप्टेंबर रोजी मध्यरात्री साडेबारा ते सकाळी अकरा वाजण्याच्या दरम्यान हांडेवाडी आणि सातारा तालुक्यातील खटाव येथे घडला. या प्रकरणी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात रोहित मांडवे, ओंकार गुरव, आकाश मांडवे, प्रकाश मांडवे, कवीश्वर मांडवे, अजय मांडवे आणि चंद्रकांत मांडवे (सर्व रा. कुमठे नागाची, ता. खटाव, जि. सातारा) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्यावर भारतीय न्याय संहिता ११८ (१), ११५ (२), १८९ (१), १८९ (२), १९०, ३५२, १३७ (२), १४२ या कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी प्रतीक वसंत विभूते (वय २३, रा. स्वप्नलोक, हांडेवाडी) यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी विभूते आणि त्यांचे मित्र डिलिव्हरी बॉय म्हणून काम करतात. त्यांचा मित्र सुमित विकास माने याचे सातारा येथील एका तरुणीबरोबर प्रेमसंबंध जुळले होते. त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. मात्र, या तरुणीच्या कुटुंबीयांनी या लग्नाला विरोध केला होता. प्रेमात बुडलेल्यांचा प्रकरण पुढे नेण्याचा निर्धार पक्का असल्याने विभूते व मित्रांकडे त्यांनी मदत मागितली. त्यामुळे विवाह लावण्यासाठी मदत करण्याचा निर्णय फिर्यादी व त्यांच्या मित्रांनी घेतला. या सर्वांनी मुलीला साताऱ्यावरून कसे आणायचे? त्यांचे कुठे लग्न लावायचे? लग्न लागल्यानंतर दोघांची कुठे व्यवस्था करायची याचे पक्के नियोजन केले. ठरल्याप्रमाणे फिर्यादी आणि त्यांचे मित्र सातार्याला गेले. त्यांनी पहाटेस या तरुणीस सोबत घेतले. तिला पळवून पुण्यामध्ये आणले. त्यानंतर ही तरुणी आणि सुमित हे दोघेही अज्ञात ठिकाणी निघून गेले. दरम्यान, मुलगी बेपत्ता झाल्याने तिचे भाऊ, नातेवाईक शोध घेऊ लागले. मध्यरात्रीच्या सुमारास सौरभ चव्हाण व ऋषीकेश मांडवे यांना घेऊन तिचे भाऊ व नातेवाईक फिर्यादीच्या सोसायटीत आले. फिर्यादी यांना त्यांनी खाली बोलावले. सुमित माने व आमची बहीण कोठे आहे, याबाबत त्यांची विचारपूस करण्यास सुरुवात केली. फिर्यादीने मला काहीही माहिती नाही, असे सांगितले.