पुणे : संपन्नता, भावसंपन्नता आणि संवेदनशीलताच कुटुंबाची परंपरा टिकवू शकते आणि आपल्याला एक नवी ऊर्जा देऊ शकते. कृतीशील परंपरेचा आदर्श हाच आपल्या संस्कृतीचा आधार आहे. असे प्रतिपादन आंतरराष्ट्रीय कीर्तीचे आत्मयोगगुरु डॉ. संप्रसाद विनोद यांनी केले.
ज्येष्ठ साहित्यिक, विचारवंत आचार्य डॉ. माधव पोतदार यांच्या द्वितीय स्मृतिदिनानिमित्त ‘शब्दसारथी’च्या वतीने देण्यात येणाऱ्या कर्तृत्वरत्न पुरस्कार प्रदान सोहळ्यात ते बोलत होते. या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून संत साहित्याचे गाढे अभ्यासक अभय टिळक उपस्थित होते. साहित्य क्षेत्रातील योगदानाबद्दल ज्येष्ठ बालसाहित्यिक ल. म. कडू, शाहिरी परंपरेतील विशेष योगदानाबद्दल शाहीर हेमंतराजे मावळे, शिक्षण क्षेत्रातील बहुमोल योगदानाबद्दल श्यामची आई फाउंडेशनच्या संस्थापक शीतल बापट, अंधांना चित्रकलेचा अनुभव देणारे चित्रकार चिंतामणी हसबनीस, ज्येष्ठ पत्रकार अरुण मेहेत्रे यांना कर्तृत्वरत्न पुरस्काराने गौरवण्यात आले. यावेळी डॉ. पोतदार यांनी लिहिलेल्या ‘अंतरीचा देव माझा’ आणि स्वप्नगंधा वस्ते यांनी लिहिलेल्या ‘मायपीस’ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.
या वेळी डॉ. विनोद म्हणाले, जो आचरणाने आपले कर्तृत्व दाखवून देतो तो खरा आचार्य असतो. डाॅ. माधव पोतदार हे खऱ्या अर्थाने आचार्य होते. विभक्त कुटुंब पद्धतीमुळे मुलांवर संस्कार कार्यालय आजीआजोबा घरात नसतात. आई-वडीलच नोकरीवर जातात. मुलांना संस्कार मिळणे अवघड झाले आहे. संस्कार हीच आपल्या भारतीय संस्कृतीची ओळख आहे. सगळ्या पालकांसमोर पालकत्वाचा गंभीर प्रश्न उभा राहिल्याचे ते म्हणाले.
अभय टिळक म्हणाले, आज दुर्दैवाने आपला समाज इतिहासात गुंतला चालला आहे. वर्तमानातील जे प्रश्न आहेत ते सोडवायची ताकद नसल्याने भविष्याकडे बघण्याची उमेद नाही म्हणून आपण जास्तीत जास्त इतिहासात गुंतत जाऊन इतिहासातील वाद व्यवहारांमध्ये आणून वर्तमान नासवण्याचे काम करत आहोत. त्यामुळे शाहीरांची, शिक्षणप्रेमींची, साहित्यिकांची, कलावंतांची भूमिका मोलाची आहे. त्यादृष्टीने आजचे हे कर्तृत्वरत्न पुरस्कार महत्त्वाचे आहेत.
यावेळी, पुरस्कारार्थी ल. म. कडू, चिंतामणी हसबनीस, शाहीर हेमंत मावळे, शीतल बापट, अरुण मेहेत्रे यांनी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक डॉ. मनिषा पोतदार यांनी केले. ‘शब्दसारथी’चे संचालक पराग पोतदार यांनी सूत्रसंचालन केले.