शहरात ठिकठिकाणी पाणी तुंबणे आणि वाहतूक कोंडी
पुणे शहरात यंदा मान्सूनचे लवकर आगमन झाले आहे. महापालिकेने पावसाळापूर्व कामे व्यवस्थित न केल्यामुळे शहराच्या विविध भागात पाणी साचत आहे. तर, काही ठिकाणी पाणी तुंबत आहे. पाऊस पडल्यानंतर शहराचा बहुतांश भाग पाण्याखाली जातो. त्यामुळे शहरात वाहतूक कोंडी होत आहे. या प्रकाराला नागरिक त्रासले आहेत. पुणे महापालिकेच्या कारभारावर यामुळे प्रश्नचिन्ह निर्माण होत आहेत. परंतु, पालिकेने मात्र निर्ढावलेपणाची हद्द गाठताना पाणी साचण्याच्या समस्येसाठी पावसालाच जबाबदार ठरवले आहे.
पुण्यात शुक्रवारी (दि. १३) संध्याकाळी मुसळधार पावसाने कहर केला. या पावसामुळे शहरातील अनेक भागात पाणी साचले होते. शहरातील बहुतांशी भागातील प्रमुख रस्ते हे पाण्याखाली होते. चार दिवसांनंतरही अनेक ठिकाणांवरील पाण्याची निचरा झालेला नाही. पाण्याचा निचरा न झाल्यामुळे या पाण्यातूनच नागरिकांना पायपीट करावी लागली होती. असे असताना, शहरात कमी वेळेत जास्त पाऊस झाल्याने शहराच्या विविध भागात पाणी साठल्याचा अजब दावा पालिकेने केला आहे. भर पावसात पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी केलेल्या कामांमुळे १० ते १५ मिनिटांत बहुतांश भागातील पाण्याचा निचरा झाल्याचा दावादेखील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी केला. पुणेकर मात्र महापालिकेच्या या बेजबाबदारपणावर संताप व्यक्त करीत आहेत.
शुक्रवारी झालेल्या मुसळधार पावसाने शहराची दाणादाण उडाली. शहरात त्या दिवशी २४ तासांत ५२ मिलिमीटर पाऊस झाला. पावसाचा जोर एवढा होता की, समोरून येणारी वाहने दिसत नव्हती. जंगली महाराज रस्ता, पौड रस्ता, कोथरूड सिटी प्राइड, अलंकार पोलीस चौकी परिसर, नरपतगिरी चौक, रास्ता पेठ, सिंहगड रस्ता, सातारा रस्ता, कात्रज, बिबवेवाडी, स्वारगेट, भंडारकर रस्ता, प्रभात रस्त्यासह मध्यवर्ती पेठेमध्ये मुसळधार पाऊस झाल्याने रस्त्यांना नदीचे स्वरूप प्राप्त झाले होते.
झोन क्रमांक एकमधील गुंजन चौक, साऊथ मेन रस्ता, आरटीओ चौक, मंगळवार पेठ मेट्रो स्टेशन, रेसिडन्सी चौक, लक्ष्मीनगर धानोरी, वाघोली परिसरातील फुलमळा, आयव्ही इस्टेट या ठिकाणी पाणी साठले होते. येथील तीन ठिकाणी पावसाळी लाईन नसल्याने रस्त्यावर पाणी साठून राहिले. तर झोन क्रमांक दोनमधील शिवनेरी पार्क, भाऊ पाटील रस्ता, सिंध सोसायटी, जंगली महाराज रस्ता, संचेती ग्रेड सेप्रेटर, कोथरूड डेपो, बधाई चौक आदी ठिकाणी पाणी साठले होते. झोन क्रमांक तीनमधील वारजे पूल, सुशीलानगरी सोसायटी, वडगाव पूल, जिजामाता भुयारी मार्ग, कात्रज चौकातदेखील मोठ्या प्रमाणात पाणी साठले होते. झोन क्रमांक चारमधील केके मार्केट, लेक टाऊन सिटी, स्वारगेट चौक, सेव्हन लव्हज् चौक तर झोन क्रमांक पाचमधील मित्रमंडळ चौक, नरपतगिर चौक, शनिपार चौक, चंदन स्वीट येथे मोठ्या प्रमाणात पाणी साठले होते, अशी माहिती पालिकेच्या अधिकाऱ्यांनी ‘सीविक मिरर’ला दिली.
पाऊस वाढून रस्त्यावर पाणी साठल्याने पाण्याचा निचरा करण्यासाठी पालिकेचे कर्मचारी रस्त्यावर उतरले. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार कमी कालावधी जास्त पाऊस झाला़. त्यामुळे काही कालावधीसाठी शहराच्या बहुतांश भागात पाणी साठून राहिले. पुणे पालिका स्तरावर क्षेत्रीय कार्यालय निहाय पथके, तसेच पालिकेकडे असलेल्या यंत्रसामग्रीच्या मदतीने तातडीने कारवाई करून पाण्याचा निचरा करण्यात आल्याचा दावा अधिकाऱ्यांनी केला. आपत्ती व्यवस्थापन कक्षदेखील अद्ययावत करण्यात आल्याने आलेल्या तक्रारींवर संबंधित खात्याशी समन्वय साधत १० ते २० मिनिटांत बहुतांशी तक्रारींचे निवारण करण्यात आल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांनी दिली.
पाणी साठणाऱ्या ठिकाणात वाढ
शहरातील रस्त्यांवर २०१ ठिकाणी पाणी साचण्याची ठिकाणी पालिकेने निश्चित केली होती. या ठिकाणांवर पालिकेकडून उपाययोजना केल्या जाणार होत्या. त्याप्रमाणे कामेदेखील सुरू करण्यात आली आहेत. मात्र, ही कामे होत असताना दुसरीकडे आणखी नवीन ७६ ठिकाणांमध्ये वाढ झाल्याची माहिती समोर आली आहे. रस्त्यावरील पाण्याचा तातडीने निचरा करण्यासाठी क्षेत्रीय कार्यालयांना सर्व सामुग्री देण्यात आली. त्यानुसार कायमस्वरूपी आणि तात्पुरत्या उपाययोजना करण्यात आल्या आहेत. काही ठिकाणी पुरेशी पावसाळी लाईन व्यवस्था नाही त्या ठिकाणी पाहणी करून लवकरात लवकर कारवाईच्या सूचना देण्यात आल्याचे अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांनी ‘सीविक मिरर’ला सांगितले.
आयुक्तांना हे स्पष्टीकरण मान्य आहे का?
महापालिका आयुक्त नवलकिशोर राम हे धडाडीने काम करणारे अधिकारी म्हणून ओळखले जातात. त्यांच्याकडे पुणे महापालिकेचा कारभार आल्यावर बेजबाबदार अधिकाऱ्यांना चाप लावून जनहिताची कामे ते तातडीने करवून घेतील, अशी अपेक्षा सर्वसामान्य पुणेकरांना होती. मात्र, शहराला तळ्याचे स्वरुप आल्यावर त्याची जबाबदारी पावसावर ढकलण्यापर्यंत बेजबाबदार अधिकाऱ्यांची मजल गेली. कार्यक्षम आणि संवेदनशील अशी ओळख असलेल्या आयुक्तांना महापालिका अधिकाऱ्यांचे हे स्पष्टीकरण मान्य आहे का, असा सवाल जागरूक पुणेकरांनी उपस्थित केला आहे.