तीनवेळा आमदार राहिलेले काँग्रेसचे नेते संग्राम थोपटे लवकरच मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहेत. काँग्रेसला राम राम ठोकत लवकरच ते भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे सांगण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार भाजपा प्रवेशासंदर्भात थोपटे यांची केंद्रीय गृहमंत्री अमिता शाहा यांच्यासोबत बैठक झाल्याचेही सांगण्यात येत आहे.
गेल्या काही दिवसांपूर्वी पुणे जिल्ह्यातून काँग्रेसचे माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी काँग्रेसला सोडचिट्टी देत शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला. आता यानंतर भोर वेल्हा मुळशी विधानसभा मतदारसंघामधून सलग तीन वेळा आमदार झालेले काँग्रेसचे नेते संग्राम थोपटे काँग्रेसची साथ सोडणार आहेत. गेल्या काही वर्षांत काँग्रेस पक्षात सातत्याने डावलल्या जाण्यामुळे नाराज असलेले संग्राम थोपटे लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा आहे.
सर्वाधिक चर्चेतील आमदार म्हणून संग्राम थोपटे यांना ओळखलं जातं. पुणे जिल्ह्यातील भोर, वेल्हे आणि मुळशी या विधानसभा मतदारसंघांमध्ये गेल्या काही दशकांपासून काँग्रेसचा प्रभाव प्रस्थापित होता, आणि या प्रभावामागे सर्वांत मोठा वाटा होता थोपटे कुटुंबाचा. माजी शिक्षणमंत्री अनंतराव थोपटे यांनी तब्बल २५ वर्षे या मतदारसंघाचे नेतृत्व केले. त्यानंतर त्यांचा वारसदार संग्राम थोपटे यांनी देखील १५ वर्षे आमदार म्हणून प्रतिनिधित्व केलं. मात्र, या राजकारणाला आता नवं वळण लागणार आहे.
काँग्रेसच्या गोटात हालचालींना वेग
थोपटे हे भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चा रंगताच काँग्रेसच्या गोटात हालचालींना वेग आला आहे. पुणे काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षांनी पुण्यातील काँग्रेस भवनात एक तातडीची बैठक बोलावली आहे. थोपटे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला तर काँग्रेसला पुण्याच मोठा राजकीय धक्का बसू शकोत. कारण संग्राम थोपटे यांचे वडील जवळपास सहावेळा काँग्रेसच्या तिकिटावर आमदार राहिले आहेत. संग्राम थोपटे हेदेखील तीन वेळा भोरमधून आमदार राहिलेले आहेत. यंदा त्यांचा पराभव झाला मात्र, त्यांचे राजकीय वजन अजूनही कायम आहे. थोपटेंच्या या राजकीय प्रवेशामुळे काँग्रेसचे मोठे नुकसान होणार हे निश्चित असल्याची चर्चा पुणेकरांमध्ये रंगली आहे.
मंत्रिपद आणि अध्यक्षपदाचं स्वप्न अधुरं
२०१९ मध्ये महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झालं तेव्हा संग्राम थोपटे यांना मंत्री किंवा विधानसभा अध्यक्षपद मिळण्याची शक्यता होती. विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले यांनी राजीनामा दिल्यावर थोपटे यांचं नाव चर्चेत आलं. त्यांनी ३० आमदारांचे समर्थन पत्र पक्षश्रेष्ठींना दिल्याचं बोललं जातं. पण शेवटी काँग्रेसमधील अंतर्गत गोंधळामुळे विजय वडेट्टीवार यांना संधी मिळाली, आणि थोपटे पुन्हा मागेच राहिले.
भाजपकडून संधीची आशा
नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत संग्राम थोपटे यांना पराभवाचा सामान करावा लागला. भोर मतदारसंघातून काँग्रेसच्या तिकिटावर लढलेल्या थोपटेंना अजित पवार गटाच्या शंकर मांडेकर यांनी तब्बल २०,००० मतांनी पराभूत केलं. मांडेकर यांना थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे समर्थन होते. या पराभवानंतर थोपटे पक्षात निष्क्रिय झाल्याचे दिसून आले. पक्षाकडून सातत्याने डावललं जात असल्याने ते आधीपासूनच नाराज होते. त्यामुळे निवडणुकीपूर्वीपासूनच ते भाजपच्या संपर्कात असल्याच्या चर्चा होत्या. आता त्या चर्चांना अधिकृत स्वरूप मिळण्याची शक्यता आहे.
वडील सहावेळा आमदार
2009मध्ये झालेल्या परिसीमनानंतर ‘भोर-वेल्हा-मुळशी’ हा मतदारसंघ अस्तित्वात आला. महाडच्या सीमेवरील वरंधा घाटापासून हा मतदारसंघ सुरू होतो. वेल्ह्यातील मढे घाट, लवासा ते मुळशीतील ताम्हिणी घाटापर्यंत हा मतदारसंघ पसरलेला आहे. बऱ्यापैकी ग्रामीण, दुर्गम, डोंगर दऱ्यांतील वस्ती, 7 मोठी धरणे, ऐतिहासिक गडकिल्ले आणि जंगलाखालील क्षेत्राची मोठी व्याप्ती असा हा मतदारंसघ आहे. 1999मधील ‘राष्ट्रवादी’चा अपवाद वगळता मतदारसंघाने कायम काँग्रेसला किंबहूना थोपटे कुटुंबाला साथ दिली आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अनंतराव थोपटे यांनी मतदारसंघाचे 6 वेळा नेतृत्व केले.
मोदी लाटेतही थोपटेंनी मतदारसंघ राखला
पश्चिम महाराष्ट्रात राष्ट्रवादीचं वर्चस्व असतानाही संग्राम थोपटे यांनी भोर मतदारसंघ राखला. पंतप्रधान नरेंद्र मोदींची लाट असतानाही त्यांनी मतदारसंघावर आपलं वर्चस्व कायम राखलं. केवळ विधानसभा मतदारसंघच नाही, तर भोरची नगरपालिका, साखर कारखाना आणि तालुक्यातील इतर संस्थांमधील सत्ताही त्यांनी राखल्या आहेत.
1952पासून भोरचे आमदार
मामासाहेब मोहोळ (काँग्रेस) कॉ. जयसिंग माळी (लाल निषाण पक्ष) शंकरराव भेलके (काँग्रेस) संपतराव जेधे (अपक्ष) अनंतराव थोपटे (काँग्रेस-सहा वेळा) काशिनाथराव खुटवड (राष्ट्रवादी कॉग्रेस) संग्राम थोपटे (काँग्रेस-तीन वेळा)