भोसरीत श्री भैरवनाथांचा छबिना उत्साहात

'श्री नाथसाहेबांच्या नावानं चांगभलं ' च्या जयघोषात भोसरीमध्ये शनिवारी (दिनांक १२) रात्री ग्रामदैवत श्री भैरवनाथांचा छबिना (पालखी) ढोल-ताशाच्या निनादात ग्रामस्थांच्या उपस्थितीत उत्साहात पार पडला.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Desk User
  • Mon, 14 Apr 2025
  • 01:18 pm
Civic Mirror, सीविक मिरर, Pune Mirror, Pune Times Mirror, Pune, Pune News

भोसरीत श्री भैरवनाथांचा छबिना उत्साहात

भविष्यवाणीत वर्तवला समाधानकारक पाऊसकाळ असल्याचा अंदाज

'श्री नाथसाहेबांच्या नावानं चांगभलं ' च्या जयघोषात भोसरीमध्ये शनिवारी (दिनांक १२) रात्री ग्रामदैवत श्री भैरवनाथांचा छबिना (पालखी) ढोल-ताशाच्या निनादात ग्रामस्थांच्या उपस्थितीत उत्साहात पार पडला. भाकणुकीमध्ये २४ खाऊच्या पानाचे १२ विडे पाहून पाऊसाचे भाकीत करण्यात आले. त्यामध्ये यावर्षीचा पाऊसकाळ हा जोरदार असणार आहे, असे भाकीत करण्यात आल्याने ग्रामस्थांच्यामध्ये उत्साहाचे वातावरण आहे. मंगळवार (दि. १५) आणि बुधवारी (दि. १६) श्री भैरवनाथ महाराजांचा उरूस असून मंगळवारी बैलगाडा शर्यत आणि बुधवारी जंगी कुस्त्यांचा आखाडा होणार आहे.

भोसरी गावठाण येथील श्री भैरवनाथ मंदिरात शनिवारी (दि. १२) रात्री  साडेआठ वाजता श्री भैरवनाथ महाराज यांची आरती भगत माजी नगरसेवक राजेंद्र लांडगे यांच्याहस्ते करण्यात आली. त्यानंतर छबिन्यास (पालखीस ) सुरवात झाली. त्यासमोर भोसरी गावातील मानाच्या सात तालीम मंडळांच्या ढोल-ताशा पथकांचा निनाद सुरु होता. भोसरीचा छबिना पंचक्रोशीत प्रसिद्ध आहे. त्यामुळे ग्रामस्थांसंह पंचक्रोशीतील भक्तगण मोठ्या उत्साहाने सहभागी झाले होते. भंडाऱ्याची उधळण करून 'श्री नाथसाहेबांच्या नावानं चांगभलं'च्या जयघोषात मारुती मंदिर येथे आरती होऊन छबिना पुढे मुख्य चौकात असणाऱ्या लक्ष्मीमाता मंदिरात श्री भैरवनाथ महाराज आणि लक्ष्मीमातेची भेट होऊन पालखी भोसरीतील प्रमुख मंदिरांना भेट देऊन पुन्हा श्री भैरवनाथ मंदिरात विसावली.

या उत्सवाचे आयोजन श्री भैरवनाथ मंदिर उत्सव समिती यांच्यावतीने करण्यात आले आहे. मंगळवार ते बुधवारी (दिनांक १५ ते १६) उरूस आयोजित करण्यात आला आहे. मंगळवारी (दिनांक १५) लोकनाट्य तमाशा आणि दुपारी बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आले आहे. तर बुधवारी (दिनांक १६) सकाळी चाकरी भजन स्पर्धा , दुपारी लोकनाट्य तमाशाची हजेरी आणि दुपारी चारनंतर महाराष्ट्रातील सर्वाधिक चर्चेत असणारा आणि ज्या कुस्ती आखाड्याची महाराष्ट्रातील कुस्तीगीर वाट पाहतात तो कुस्त्यांच्या फडाचे आयोजन करण्यात आले आहे.

१२ विड्यांच्या पानाचे भाकीत

हेमंत तिखे गुरुजी यांनी पंचांगानुसार गुढी पाडव्याला २४ खाऊच्या पानामध्ये धान्यांचा विडा बांधलेला असतो. भाकणूक वर्तवण्याच्यावेळी हे  १२ विडे सोडून त्याप्रमाणे भाकणूक वर्तवण्यात येते. विडा सोडल्यानंतर काही विड्यातून पाणी पडते त्यावेळी त्या नक्षत्रांमध्ये पावसाचे प्रमाण मोठे असणार, असे भाकीत करण्यात येते. त्यानंतर काही विड्यांना फक्त पाणी सुटलेले असेल तर जेमतेम पाऊस पडेल असे भाकीत वर्तवतात. तर काही विडे खोलल्यानंतर ते पूर्णपणे कोरडे असतात, त्यावेळी त्या महिन्यात पाऊस पडणार नाही, असे भाकीत सांगण्यात येते. यासर्वांचा  अंदाज घेऊन या वर्षांमध्ये पाऊसकाळ कसा पडेल याबाबत भविष्यवाणी करण्यात आली. त्यामध्ये पाऊसकाळ भरपूर राहील, त्यामुळे पूरसदृश परिस्थिती निर्माण होईल असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. तसेच वर्षभरच्या भाकितामध्ये महागाई वाढेल, अन्नधान्य महाग होईल, चोऱ्या-माऱ्या वाढतील, वाद-विवाद वाढतील असे अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

Share this story

Latest