प्रातिनिधिक छायाचित्र...
Pimpri Chinchwad | दिघी परिसरातील आदर्श नगर आणि भारत माता नगर या भागांमध्ये आज (सोमवार) पहाटेपासून अचानक वीजपुरवठा खंडित झाल्याने नागरिकांची मोठी गैरसोय झाली आहे. सकाळी ३ वाजण्याच्या सुमारास आळंदी रस्त्यावर पठाण बाबा दरग्याजवळील विद्युत केबलमध्ये लागलेल्या आगीत आठ वीज केबल्स पूर्णतः जळून गेल्या आहेत. परिणामी दिघी आणि व्हीएसएनएल फीडर काम करेनासे झाले आहे.
या घटनेबाबत माहिती देताना महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी (महा वितरण / MSEDCL) च्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, "पठाण बाबा दरग्याजवळ साचलेल्या कचऱ्याला लागलेल्या आगीमुळे जवळच असलेल्या वीज केबल्स झळाळून पूर्णतः जळून गेल्या. एकूण आठ केबल्स जळाल्याने वीजपुरवठा पूर्णतः खंडित झाला आहे."
सध्या महावितरणचे पथक घटनास्थळी असून,वीजपुरवठा पूर्ववत करण्यासाठी युद्धपातळीवर दुरुस्तीचे काम सुरू आहे. दरम्यान, पहाटेपासून वीज नसल्याने नागरिकांचे दैनंदिन व्यवहार विस्कळीत झाले आहेत. विशेषतः छोटे व्यावसायिक, दुकानदार आणि गृहिणी यांना याचा मोठा फटका बसत आहे.